गायीच्या दूध दरात प्रति लिटर तब्बल 12 रुपयांची घसरण
दराच्या प्रश्नासंदर्भात नेते मंडळी गप्प
वाल्हे – पुरंदर तालुक्यासह जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती आहे. दुधाचे उत्पादन घटले आहे. गायीच्या दूध दरात प्रति लिटर तब्बल 12 रुपयांची घसरण झाली आहे. तरीही शेतकरी संघटना असतील किंवा विरोधी पक्षातील नेते मंडळी असतील, कुणीही दूध दराच्या प्रश्नासंदर्भात आवाज उठवताना दिसत नाहीत. त्यामुळे शेतीला पूरक असणारा व शेतकऱ्यांना दोन पैसे मिळवून देणारा दूध व्यवसायासारखा जोडधंदा आता आतबट्ट्यात आला आहे.
शेतीला जोडधंदा म्हणून राज्यात बहुतांश शेतकरी दुग्ध व्यवसायाला पसंती देतात. अनेक तरुण शेतकऱ्यांसह अलिकडील काही वर्षात सुशिक्षित व पदवी प्राप्त तरुण दूध धंद्याकडे प्रमुख व्यवसाय म्हणून वळले आहेत. अनेक अडचणी असून देखील दूध धंद्याने अनेक शेतकऱ्यांना प्रगतीचे दिवस दाखवले आहेत. परंतु गेल्या काही काळापासून दूध धंद्यात अडचणींची भरच पडतेय.
गेल्या वर्षी जनावरांना लम्पी रोगाने ग्रासले. या रोगामुळे संपूर्ण राज्यातील जनावरांचे बाजार बंद ठेवावे लागले. अनेक जनावरे या आजाराने दगावली. दुग्ध व्यवसायावर याचा मोठा परिणाम झाल्यानंतर दूध उत्पादक पुन्हा एकदा कसेबसे सावरत उभे राहिले. मात्र, आता सतत टप्प्याटप्प्याने घसरत चाललेल्या दूध दराने अडचणीत वाढ होत चालली आहे.
जर्सी दुभत्या गायीच्या माध्यमातून शेतीला मोठ्या प्रमाणात शेणखत उपलब्ध होते. ग्रामीण भागात शेतीला जोडधंदा म्हणून मोठ्या प्रमाणात दूध व्यवसाय केला जातो. शेतीतील उत्पन्न पीक लागवडीनंतर किमान सहा महिने तरी येत नाही, तोपर्यंत खर्चासाठी म्हणून दूध व्यवसाय फायदेशीर ठरतो. रासायनिक खताचे दर गगनाला भिडल्याने शेतकरी आता रासायनिक खताऐवजी शेण खताकडे वळला आहे.
ज्या शेतकऱ्याकडे घरचा चारा उपलब्ध आहे त्याला दूध व्यवसाय थोडाफार परवडतो. मात्र विकत घेऊन चारा घालणे हे परवडणारे नाही. गेल्या सुमारे महिन्यापासून दुधाचे दर लिटरला कमीच होत आहेत.
गेल्या साधारण महिन्या पासून कमी झालेले दुधाचे दर, तर पशुखाद्य, हिरवा चारा, चुरापेंड यांचे वाढलेले दर यामुळे ग्रामीण भागातील दूध व्यवसायाला घरघर लागली आहे. दरम्यान भविष्यातील चारा, पाणी टंचाईची चाहूल लागल्याने दावणीला असलेली दुभती जनावरे शेतकरी येईल त्या किमतीला विकू लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे. दरम्यान, यावर्षी पाऊस कमी झाल्याने जनावरांच्या चाऱ्याचा व पाण्याचा प्रश्न निर्माण झाल्यामुळे पशुधन कसे सांभाळायचे? असा प्रश्न दूध उत्पादकांपुढे निर्माण झाला आहे.
34 रुपये दर कागदावरच
जुलै महिन्यात राज्य शासनाने राज्यातील सहकारी व खासगी दूध संघ, दूध उत्पादकांना 3.5, 8.5 गुणवत्तेच्या दुधाला किमान 34 रुपये दर निश्चित केले आहेत. याबाबत दुग्ध व पशुसंवर्धन मंत्रालयामार्फत 21 जुलै 2023 रोजी जीआर काढून अंमलबजावणीचे आदेश दिले गेले; परंतु या निर्णयाला चार महिने उलटून गेल्यानंतरही दरवाढ मिळाली नाही.या उलट दुधाचे दर टप्प्याटप्प्याने सहा रुपयांनी घसरले असून दूध उत्पादकांचे मोठे नुकसान होत आहे. या निर्णयाचा शासनाला व समितीला मात्र विसर पडल्याचे दिसून येत आहे.
मोठा आर्थिक तोटा
अनेक शेतकऱ्याकडे किमान 10 ते 15 दुभत्या जर्सी गायी आहेत. चांगले दूध देणाऱ्या गायीची किंमत 90 हजारांपासून सव्वा लाखापर्यंत आहे. मात्र भविष्यातील धोका ओळखून 90 हजारांची गाय 50 ते 60 हजाराला शेतकरी विकू लागला आहे. त्यामुळे मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे.
या अडचणींमुळे घरघर
चाऱ्यासाठी म्हणून मका लागवड मोठ्या प्रमाणात केली जाते. सध्या साखर कारखाने सुरू आहेत. त्यामुळे उसाचे हिरवे वाढे उपलब्ध आहे. मात्र कारखाने बंद झाल्यानंतर चाऱ्याची मोठी अडचण होणार आहे. एकूण परिस्थिती पाहिली असता या सर्व अडचणीमुळे दूध व्यवसायाला घरघर लागली आहे.
पशुखाद्य महागले
दुधाच्या दरात घसरण होत असताना देखील पशुखाद्याच्या किंमती मात्र वाढतच आहेत. कच्चा माल महाग झाला आहे हे कारण पुढे करून पशुखाद्य कंपन्यांनी आपापल्या पशुखाद्याच्या 50 किलो प्रीती गोणी मागे, मे महिन्यापासून 100 रुपयांची वाढ केली आहे, असे शेतकऱ्यांनी सांगितले.