अधिकाऱ्यांसमोर उद्योजकांनी वाचला समस्यांचा पाढा
महाळुंगे इंगळे – चाकण परिसरात सतत वीज जाणे, फ्लकच्युएशन होणे, ट्रीपिंग होणे, लोड शेडींग, वेळेवर कंडक्टरची दुरुस्ती न होणे, प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स न होणे या समस्यांमुळे वीजपुरवठा खंडित होतो त्यामुळे चाकण परिसरातील उद्योजक त्रस्त झालेले आहेत, उद्योगांचे फार मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे.
ग्राहकांना माल वेळेवर देता येत नाही, वीज गेल्यामुळे मशीनमध्ये असलेल्या मालाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते तो संपूर्ण लॉट भंगारात जमा होतो, मशीनचा मेंटेनन्स वाढतो, वरून कामगारांना बसून मजुरी द्यावी लागते व त्या काळात डीझेलवर मशीन चालवल्यामुळे कारखान्यांचा खर्च वाढतो करिता फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीजने वीज वितरण कंपनीचे वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर मंगळवारी (दि. 17) शिंडलर इंडिया प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीच्या सभागृहामध्ये संयुक्त बैठक घेतली.
या सभेस महावितरणचे प्रादेशिक संचालक अंकुश नाळे, मुख्य अभियंता राजेंद्र पवार, अधीक्षक अभियंता युवराज जरग, कार्यकारी अभियंता येडके त्याचबरोबर फेडरेशन ऑफ चाकण इंडस्ट्रीचे सचिव दिलीप बटवाल, खजिनदार विनोद जैन, अनिल बजाज, अजय खुल्लर, पार्थ कुलकर्णी, मार्टिन फर्नांडिस, संजय गुप्ता इत्यादी पदाधिकारी, सभासद व बहुतेक मोठ्या सर्व कंपन्याचे प्रतिनिधी या मिटींगला उपस्थित होते.
या सभेत उद्योगांच्या प्रतिनिधींनी समस्यांचा पाढा वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांसमोर मांडला. त्यावेळी प्रादेशिक संचालक अंकुश नाळे यांनी सांगितले की, चाकण एमआयडीसीमधील उद्योगांचे खंडित वीज पुरवठ्यासह इतर वीज प्रश्न सोडविण्यासाठी युद्ध पातळीवर उपाययोजना करण्यात येतील, सोबत विविध योजनांद्वारे सुरू असलेल्या वीज यंत्रणेच्या सक्षमीकरण व विस्तारीकरणाच्या कामांना गती देण्यात येईल अशी ग्वाही दिली.
उद्योजकांचे स्थानिक वीजप्रश्न सोडविण्यासाठी प्रत्येक महिन्याच्या तिसऱ्या बुधवारी दुपारी तीन वाजता उद्योजकांच्या प्रतिनिधींसमवेत महावितरणच्या अधिकाऱ्यांची या सर्व समस्या संपेपर्यंत बैठक आयोजित करावी.
– अंकुश नाळे, प्रादेशिक संचालक, महावितरण.