इंदापुरात मंगल कार्यालये फुल्ल : गरिबांसाठी सामुदायिक सोहळ्यांची गरज
नीलकंठ मोहिते
इंदापूर – करोना कालावधीत नात्यातील, गावातील, घरा शेजारील लग्न सोहळे वा छोटे – मोठे कार्यक्रम झालेलेदेखील समजत नव्हते. घरातील मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत गाजावाजा न करता निर्बंधाचा तगादा रोगापासून सुटका या चिंतेत, कार्य करायची म्हणून लग्न सोहळे होत होते. प्रचंड गाजावाजा, जेवणावळी, बॅन्ड या सर्वांनाच प्रतिबंध होता.
आता करोनाचे निर्बंध हटविण्यात आल्याने, इंदापूर तालुक्यातील गावा – गावात सर्वत्र लग्न समारंभाची लगीनघाई सुरु दिसतेय. मे महिन्यात सर्वाधिक लग्नतिथी असून हे समारंभ पाहुण्यांच्या गर्दीने हाऊसफुल्ल झाले आहेत. कधी नव्हे इतका खर्च, कर्णकर्कश आवाज, नवरदेवाच्या घोड्यासमोर नाचणारी युवकांची अनोखी फळी, यामुळे सर्वत्र हाऊसफुल वातावरण निर्माण झाले आहे.
लग्न समारंभ परंपरेनुसार पार पाडत असले तरी त्याचा ट्रेंड बदलला आहे. भव्य मंडप, बुफे जेवण, कॅटरर्सची पद्धत आणि यातून होणार अवाढव्य खर्च, याची पर्वा न करता समारंभ लग्न इतरांच्या लग्नापेक्षा मोठे लग्न करण्याचा मानस ग्रामीण भागात शहरी भागात चाललेला दिसतो आहे. निमगाव केतकी, इंदापूर शहर, भिगवण, बावडा अशा शहरी भागातील हा ट्रेंड आता ग्रामीण भागातही पोहचला आहे.
त्यामुळे पंगतीतील पत्रावळींवरील जेवण, चार दिवसांपासून होणारे साहित्य, लग्नातील विविध कार्यक्रम आता आधुनिक पद्धतीने केला जात आहेत.
सध्या लग्नसराई सुरु असून शहरातील सर्वच मंगल कार्यालय आणि लॉन्स मंगल कार्यालय हाऊसफुल्ल असल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. प्रतिष्ठा जपण्याच्या हव्यासापायी ‘होऊ द्या खर्च, चर्चा तर होणारच आहे’ अशी मानसिकता आता ग्रामिण भागातही होऊ लागली आहे. आधुनिक युगात लग्न सोहळ्यात मोठ्या प्रमाणात बदल होत आहे. हुंडा पद्धती बंद असली तरी संसारोपयोगी दागिने, महागड्या साड्या, पंचपक्वान्नाची पंगत आदी सर्व वधू पित्यास हायटेक पद्धतीनुसार करावे लागते.
जेवणाचे मेन्यूसुद्धा जास्त असून गोड पदार्थ दोन प्रकारचे, भात, पुरीभाजी यामुळे बुफे जेवणाचे ताट बाजवीपेक्षा जास्त भरुन घेत असल्याने अन्नाची नासाडी हा चिंतेचा विषय झाला आहे. तसेच लग्न समारंभावरील खर्चाची मर्यादा आता अमर्यादीत झाली आहे.
काढ कर्ज, कर लग्न
ग्रामीण भागातील सर्व शेतकऱ्यांची नागरिकांची परिस्थिती अत्यंत मोठी नसते; परंतु गावातील एका गरिबाचे लग्न मोठे झाले, हा मेसेज वाऱ्यासारखा सोबतच्या पाच गावांमध्ये पसरतो. त्यामुळे उजनी जलाशयाच्या पट्ट्यातील गोरगरीब नागरिकांच्या घरातील लग्नदेखील अक्षरश: कर्ज काढून, मोठी केली जात आहेत; मात्र याचा पश्चाताप आगामी काळात गरीब कुटुंबांना होणार हे मात्र निश्चित.
सामुदायिक लग्न सोहळा होण्याची नितांत गरज
इंदापूर तालुक्यात माजी मंत्री हर्षवर्धन पाटील हे सत्तेवर असताना सामुदायिक विवाह सोहळे एक रुपया खर्च न करता केले जात होते; मात्र सध्या इंदापूर तालुक्यामध्ये ही प्रथा मागे पडली आहे. त्यामुळे गरीब मागासवर्गीय उपेक्षित कुटुंबातील वधू-वर यांच्या पालकांची सामुदायिक लग्न सोहळा इंदापूर तालुक्यामध्ये आयोजित केला जावा, अशी अपेक्षा आहे. यामध्ये सार्वजनिक बांधकाम राज्यमंत्री दत्तात्रय भरणे यांनी अधिकचे लक्ष घालून, सामुदायिक लग्न सोहळे सुरू करावेत. अशी मागणी जोर धरू लागली आहे.