पुणे – राज्यातील विविध विद्यापीठांतील परीक्षेच्या पद्धतीत एकसमानता आणि निकाल वेळेवर जाहीर करण्यासाठी काही विद्यार्थ्यांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यासंदर्भात सोमवारी सुनावणी होणार आहे.
उच्च शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी राज्यातील सर्व अकृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंसोबत झालेल्या बैठकीत विद्यार्थ्यांची परीक्षेचे नियोजन, परीक्षांमध्ये एकसमानता, विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करून देणे, वेळेवर निकाल लागणे यासंदर्भात चर्चा झाली. परंतु त्यानुसार सर्व विद्यापीठांकडून कार्यवाही होत नसल्याचे दिसून येत आहे. काही विद्यापीठांनी ऑफलाइन परीक्षेचा निर्णय घेतला, पण ती एमक्युसी पद्धतीने होणार असल्याचे जाहीर केले आहे. तसेच परीक्षांमध्ये कोणत्याच विद्यापीठात एकसमानता नसल्याचे स्पष्ट होत आहे.
अद्याप विद्यापीठाकडून प्रश्नसंच उपलब्ध न झाल्याने परीक्षेचे नियोजन लांबणीवर पडणार आहे. त्यामुळे परदेशी शिक्षणासह इतर शिक्षणासाठी प्रवेशास विद्यार्थ्यांना अडचणींना सामोरे जावे लागणणार आहे. मात्र सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने प्रचलित पद्धतीनेच ऑफलाइन परीक्षा घेण्याचा निर्णय घेतला आहे. सर्व विद्यापीठांच्या परीक्षा पद्धतीत एकसमानता असावी, अशी विद्यार्थ्यांची मागणी आहे. दरम्यान, असे बदल झाल्यास राज्यभरातील उच्च शिक्षणाबाबत एकसूत्रता येणार आहे, असे विद्यार्थ्यांचे म्हणणे आहे.
राज्यातील विद्यापीठांच्या परीक्षांमध्ये कुठेही एकसमानता येताना दिसत नाही. तसेच विद्यापीठांनी विद्यार्थ्यांना प्रश्नसंच उपलब्ध करुन दिले नाहीत. त्याचा परिणाम परीक्षा, निकालास उशीर लागणार असून विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या प्रवेशास अडचणी निर्माण होणार आहे. म्हणूनच आम्ही राज्यातील विद्यापीठातील विद्यार्थी प्रतिनिधी यांच्या मदतीने परीक्षामंध्ये एकसमानता असावी याकरता न्यायालयात धाव घेत याचिका दाखल केली आहे.
कल्पेश यादव, सहसचिव, युवा सेना