सासवड -पुरंदर तालुक्यात प्रस्तावित आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पारगाव, एखतपूर, मंजवडी, खानवडी, कुंभारवळण, वनपुरी, यांच्या सह सात गावातील भूसंपादनास सुरूवात करण्यापूर्वी या निश्चित करण्यात आलेल्या जागेसह याच तालुक्यातील लगतच्या पर्यायी चार जागांची हवाई दल आणि लष्काराकडून पुन्हा एकदा तपासणी करून घ्यावी. असे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी प्रशासनाला दिल्यानंतर ही जागा बदलली जाईल? नवीन जागा कोणती असेल? या चर्चांनी तालुका ढवळून निघाला आहे.
पुरंदर प्रस्तावित विमानळसंदर्भात उपमुख्यमंत्री पवार यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी (दि. 13) मुंबईत बैठक झाली. भूसंपादन गतीने व्हावे आणि शेतकऱ्यांचाही अधिकचा फायदा कसा होईल, यासाठी मोबदला निश्चित करताना एकच पर्याय न ठेवता दोन ते तीन पर्याय एकत्रित करून सर्वोत्तम पर्याय सादर करावा, अशा सूचना पवार यांनी यापूर्वी दिल्या होत्या. त्यामुळे पुरंदरमधील विमानतळ हे पूर्वीच्या सात गावांत किंवा त्याच लगत असणाऱ्या गावातील जागेवर होणार असल्याने याबाबत परिसरातील शेतकऱ्यांच्यात संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.
पुरंदर विमानतळासाठी केंद्र सरकारकडून तसेच संरक्षण विभागाकडून आवश्यक त्या परवानग्या मिळालेल्या आहेत. भूसंपादनासाठी चार पर्याय निश्चित केले होते. मात्र, राज्य सरकारने त्यावर अद्याप निर्णय घेतला नव्हता. त्यामुळे विमानतळाचे काम थांबले होते; परंतु आता जागेमध्ये बदल करावयाचा झाला तर या परवानग्या नव्याने घ्याव्या लागतील की काय याचा विचार शासनस्तरावर होण्याची शक्यता आहे.
या जागेचे फेर सर्वेक्षण करण्याचे आदेश दिल्याने आमच्या चार वर्षांतील लढ्याला यश आले आहे. यामुळे अल्पभूधारक शेतकरी व त्याचबरोबर बाधित असणाऱ्या शेतकऱ्यांना न्याय मिळाला आहे. आमच्या लढ्याची दखल शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, खासदार सुप्रिया सुळे, आमदार संजय जगताप यांनी घेतल्याबद्दल संघर्ष समितीच्या वतीने आम्ही त्यांचे आभार मानतो.
– दत्ता झुरुंगे, अध्यक्ष, विमानतळ विरोधी संघर्ष समिती