अजानवृक्षाचे रोपण, सुवर्णपिंपळ बीज प्रसाद वाटप
परकीय जैविक आक्रमणाविरोधात घेतली शपथ
भोर – इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यांर्गत पायी दिंडी परिक्रमा इंद्रायणी तटावरील विविध गावांत समाज प्रबोधन करत मार्गस्थ होत आहे. याच परिक्रमेचा भाग म्हणून गुरुवारी (दि. २१) श्रीक्षेत्र कुरवंडे इंद्रायणी नदी उगमस्थान येथे अनोख्या पद्धतीने पालखी सोहळ्याचे आयोजक, ग्रामस्थ आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून उपस्थित असलेला वारकरी संप्रदाय यांनी पर्यावरणाचा जागर केला.
याप्रसंगी हरित आणि आध्यात्मिक वारसावृक्ष अर्थात अजानवृक्षाचे रोपण कुरवंडे गावातील कोराआई देवी मंदिर परिसरात करण्यात आले. या वृक्षाचे रोप हे आळंदीतील मूळ वृक्षापासून तयार करण्यात आले आहे. आळंदी येथील सुवर्ण पिंपळाचा बीज प्रसाद उपस्थित वारकरी व गावकरी यांना रोपणासाठी वाटण्यात आला. आपल्या राष्ट्रावर होणाऱ्या आगंतुक जैविक आक्रमणाविरोधातील आणि हरित चळवळीच्या प्रतिज्ञेचे सामुहिक वाचन याप्रसंगी करण्यात आले.
इंद्रायणी नदीमध्ये होणारे जैविक व रासायनिक प्रदूषण, उपद्रवी परदेशी वनस्पती आणि जलचरांचा होणारा प्रादुर्भाव, याबाबत उपस्थितांशी संवाद साधण्यात आला. इंद्रायणी माता परिक्रमा पालखी सोहळ्यात सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी कुरवंडेपासून ते नागफणी (डूक्स नोज) इंद्रायणी नदी उगमस्थान कुंड आणि फणेश्वर महादेव मंदिरापर्यंत श्री संत ज्ञानेश्वर महाराज प्रतिमा, पादुका, इंद्रायणी जल कलश, तुळस व अजानवृक्षाचे रोपे पायी पालखीतून पूजनासाठी नेण्यात आली.
इंद्रायणी कुंड आणि फणेश्वर महादेव शिवलिंगावर इंद्रायणी आणि भारतभरातून संकलित केलेल्या पवित्र जलाचा जलाभिषेक करण्यात आला. याठिकाणी इंद्रायणी मातेची आरती, अभंग-गीते आणि पसायदान यांचे सादरीकरण करण्यात आले. पर्यावरण, ऐतिहासिक आणि अध्यात्मिक वारसा असलेल्या या क्षेत्राविषयी उपस्थित जनमानसात तसेच समाज माध्यमाच्या लिंकवरून जागर करण्यात आला असल्याचे बायोस्फिअर्सचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर यांनी सांगीतले.
याप्रसंगी श्रीक्षेत्र कुरवंडे गावाचे हभप सुभाष महाराज पडवळ, उपक्रमाचे आयोजक ह भप गजानन महाराज लाहुडकर, हभप सागर महाराज लाहुडकर, नमामि इंद्रायणी प्रतिष्ठानचे कार्याध्यक्ष, ज्येष्ठ पत्रकार अर्जुन मेदनकर, बायोस्फिअर्स संस्थेचे संस्थापक अध्यक्ष, पर्यावरण अभ्यासक डॉ. सचिन पुणेकर, संत साहित्याचे अभ्यासक-लेखक दत्तात्रय महाराज गायकवाड, माऊलींचे मानकरी गणपतराव कुऱ्हाडे, कुरवंडेचे ग्रामस्थ निर्मला कडू, किसन मराठे, मनीषा कडू, वैशाली मातेरे, योगिता कचरे, पार्वतीबाई शिंदे, वैशाली बोरकर, बेबीबाई कडू, सुरेखा जांभूळकर, महादेव राऊत उपस्थित होते.