स्वराज्य बहुजन सेनेचे शिरूर तहसीलसमोर थाळीनाद आंदोलन
शिक्रापूर – शिरूर तालुक्यातील अनेक भिल्ल समाजातील कुटुंबांना शासनाकडे पाठपुरावा केल्याने रेशन कार्ड देण्यात आलेले असून कोणत्याही कार्ड धारकांना रेशनवरील धान्य दिले जात नाही. भिल्ल समाजातील नागरिकांना धान्य देण्याच्या मागणीसाठी तहसील कार्यालयासमोर थाळीनाद आंदोलन करत धान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे.
डिंग्रजवाडी येथील भिल्ल समाजातील नागरिकांना अनेक वर्षे रेशन कार्डपासून वंचित असल्याने त्यांना शासनाच्या कोणत्या योजनेचा लाभ घेता येत नसल्याने स्वराज्य बहुजन सेनेचे अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांनी शासकीय पातळीवर पाठपुरावा केल्याने यापूर्वी भिल्ल समाजातील कुटुंबियांना रेशन कार्ड देण्यात आले;
मात्र अनेक दिवस उलटून देखील तहसील कार्यालय कडून या कुटुंबियांना रेशनकार्ड वरील धान्य भेटत नसल्याने तहसील कार्यालयात पाठपुरावा करुन देखील अनेक विभागातील अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. स्वराज्य बहुजन सेनेचे अध्यक्ष राजाराम दगडे पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिरुर तहसील समोर थाळीनाद आंदोलन करण्यात आले,
यावेळी स्वराज्य बहुजन सेनेचे महिला प्रदेशाध्यक्ष स्वाती शिवले, पुणे जिल्हाध्यक्ष रेखा भंडारे, शिरुर तालुकाध्यक्ष विशाल घोंगडे, रघुनाथ भवार, मयूर साळवे, मंदा बोरकर, छाया गालफाडे, उषा कांबळे, विमल मोरे, सागर वानकर आदी उपस्थित होते.
भिल्ल समाजाच्या नागरिकांच्या धान्याच्या मागणीचे पत्र मिळाले असून त्यांना रेशन कार्ड देण्यात आलेले आहे, मात्र ते कार्ड ऑनलाइनमध्ये नोंद नसल्याने अडचणी येत होत्या; मात्र आता त्यांचे कार्ड ऑनलाइन नोंद केले असून पुढील महिन्यापासून त्या कुटुंबांना धान्य व अन्य लाभ मिळेल.
-बाळासाहेब म्हस्के, तहसीलदार शिरूर