वडूज – भाजप सरकारची जनविरोधी धोरणे कार्यकर्त्यांनी जनतेपर्यंत पोहोचवावी. यासाठी प्रत्येक तालुक्यात आयोजित करण्यात आलेले कॉंग्रेस योध्दा प्रशिक्षण महत्वपूर्ण ठरेल असे मत माजी मुख्यमंत्री, आमदार पृथ्वीराज चव्हाण यांनी व्यक्त केले.
खटाव व माण तालुका कॉंग्रेस कमिटीच्यावतीने आज येथे कॉंग्रेस योध्दा प्रशिक्षण झाले. त्याप्रसंगी श्री. चव्हाण बोलत होते. यावेळी जिल्हाध्यक्ष डॉ. सुरेश जाधव, अखिल भारतीय कॉंग्रेस कमिटीचे सदस्य रणजितसिंह देशमुख, महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे
सचिव राजेंद्र शेलार, कॉंग्रेसचे खटाव तालुकाध्यक्ष डॉ. संतोष गोडसे, माणचे तालुकाध्यक्ष बाबासाहेब माने, बाजार समितीचे उपसभापती विजय शिंदे, राजूभाई मुलाणी, माजी नगराध्यक्ष डॉ. महेश गुरव, नगरसेवक अभय देशमुख, परेश जाधव, युवक कॉंग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमरजित कांबळे, अल्पसंख्यांकचे जिल्हाध्यक्ष झाकीर पठाण, लोकायतचे समन्वयक नीरज जैन, माण विधानसभा मतदार संघाचे अध्यक्ष ऍड. संदीप सजगणे, शिवाजीराव यादव, धर्मराज जगदाळे, प्रा. विश्वंभर बाबर यांची प्रमुख उपस्थिती होती.
देशाच्या स्वातंत्र्य लढ्यात कॉंग्रेसचे योगदान असल्याचे सांगून श्री. चव्हाण म्हणाले, स्वातंत्र्यानंतरच्या गेल्या सत्तर वर्षांच्या काळात गांधी, नेहरू आदी कॉंग्रेस नेत्यांच्या दूरदृष्टीमुळे शेती, वीज, सिंचन, औद्योगिक आदी क्षेत्रांत देशाला प्रगतीवर नेणारी कामे झाली आहेत. मात्र आज आरएसएस व भारतीय जनता पक्षाचे लोक कॉंग्रेसने
सत्तर वर्षांत काय केले? असा प्रश्न उपस्थित करीत आहेत. 2014 नंतर मोदी सरकारच्या काळात अदानी, अंबानी सारख्या उद्योजकांच्या हाती देशातील महत्वपूर्ण प्रकल्प सोपवून त्यांचे खासगीकरण केले जात आहे. शिवाय देशात प्रचंड महागाई, बेरोजगारीची समस्या निर्माण झाली आहे.
लोकांना भेडसावणाऱ्या समस्यांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून या जातीयवादी प्रवृत्तींकडून लोकांमध्ये जाती- धर्मांत कलह निर्माण करून देशाच्या व जनतेच्या मूलभूत प्रश्नांवरून लक्ष विचलीत केले जात आहे. कॉंग्रेस नेते राहुल गांधी यांनी भारत जोडो यात्रा काढल्याने देशातील एकसंघ जनता कॉंग्रेसच्या पाठीशी राहण्यास मोठी मदत झाली आहे. कर्नाटक विधानसभेच्या निकालात तेथील जनतेने या जातीयवादी प्रवृत्तींना झिडकारत कॉंग्रेसच्या हाती सत्ता दिली आहे. देशातील जनतेत आरएसएस, भाजपविरोधी धोरणांबद्दल तीव्र असंतोष उफाळून येत आहे. जनता आता कॉंग्रेसच्या विचारधारेत येऊ लागली आहे.
श्री. देशमुख म्हणाले, आरएसएस, भाजप या जातीयवादी प्रवृत्ती लोकांमध्ये तेढ निर्माण करून देशाची अखंडता धोक्यात आणत आहेत. भाजपच्या माध्यमातून देशाची हुकूमशाहीकडे सुरू असलेली वाटचाल रोखण्यासाठी वेळीच पावले उचलणे गरजेचे आहे. यावेळी विविध मान्यवरांनी मनोगते व्यक्त केली. यावेळी मोहनराव देशमुख, हणमंत भोसले, नितीन घार्गे, सुजाता महाजन, शारदा भस्मे, विष्णूपंत अवघडे, ऍड.पी.डी. सावंत, मुबारक मुल्ला, परेश जाधव, इम्रान बागवान, धनाजी निंबाळकर, किशोर ढोले, सचिन घाडगे, जीवन कांबळे तसेच खटाव,माण तालुक्यातील कॉंग्रेस पदाधिकारी, कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.