भिगवणजवळील म्हसोबावाडीतील घटना
भिगवण – येथून जवळच असलेल्या म्हसोबावाडी येथे शेतातील विहिरीचे रिंग बांधकाम करताना मुरूम ढासळल्याने इंदापूर तालुक्यातील बेलवाडी गावातील चार मजूर गाडले गेले. या मजुरांना बाहेर काढण्यासाठी शर्थीचे प्रयत्न आज रात्री नऊ वाजेपर्यंत सुरू होते; मात्र एकही व्यक्ती मिळाली नाही. सकाळपासून त्यांचा पुन्हा शोध सुरू राहणार आहे. ही घटना मंगळवारी (दि. 1) रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास घडली.
सोमनाथ लक्ष्मण गायकवाड (वय 32), जावेद अकबर मुलाणी (वय 30), परशुराम चव्हाण (वय 30) आणि मनोज मारुती चव्हाण (वय 40, सर्व रा. बेलवाडी, ता. इंदापूर) अशी या मजुरांची नावे आहेत. सणसर येथील विजय अंबादास क्षीरसागर यांच्या म्हसोबावाडी (ता. इंदापूर) गावच्या हद्दीत कवडे वस्तीलगत जमीन गट नंबर 338 मध्ये असलेल्या विहिरीचे रिंग बांधकाम सुरू होते. ही विहीर 127 फूट खोल व 120 गोल व्यासाची आहे. क्षीरसागर यांच्याविरोधात भिगवण पोलीस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन अपर पोलीस अधीक्षक आनंद भोईटे, बारामतीचे विभागीय पोलीस अधिकारी गणेश
इंगळे, सहायक निरीक्षक दिलीप पवार व त्यांचे सहकारी तसेच तहसीलदार तळ ठोकून आहे. या अडकलेल्या मजुरांना बाहेर काढण्यासाठी जेसीबी, पोकलेन तसेच रेस्क्यू ऑपरेशन सुरू करण्यात आले आहे. एनडीआरएफची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे. हे चार कामगार त्या ठिकाणी विहिरीचं रिंग मारण्याचं काम करीत होते आणि अचानक त्यांच्यावरती मुरुमाचा ढीग आणि विहिरीचा स्लॅब कोसळला. त्या ढिगाऱ्याखाली हे मजूर अडकले.
हे चारही लोक नेहमीप्रमाणे आपल्या घरी सायंकाळी परतले नाही तेव्हा शोधाशोध सुरू झाली आणि हा शोध शेवटी त्या विहिरी जवळ येऊन थांबला. त्या ठिकाणी त्यांच्या दुचाकी गावकऱ्यांना दिसून आल्या मात्र ते चार लोक आणि त्यांचे मोबाईल मात्र लागू शकले नाहीत. त्यानंतर गावकऱ्यांनी या ढिगाऱ्याखाली हे लोक अडकले असल्याची भीती व्यक्त केली. काही जेसीबी आणि पोकलेन मशीनच्या मदतीने हा ढिगारा आता बाजूला करण्याचं काम सुरू आहे. घटनास्थळी आमदार दत्तात्रय भरणे, तहसीलदार श्रीकांत पाटील उपस्थित आहेत. अद्याप एकही कामगार सापडला नाही.
अवघ्या दोन-तीन दिवसांचं काम शिल्लक होतं
गेली दीड ते दोन महिने हे काम सुरू होते आणि अवघ्या दोन ते तीन दिवसांचे काम राहिले होते. या ठिकाणी तब्बल 11 मजूर काम करत होते. मात्र, पौर्णिमा असल्याने गोंदवले येथील गोंदवलेकर महाराजांच्या दर्शनासाठी सात मजूर गेले होते. हे सात जण कामावर नव्हते, अन्यथा काय घडले असते या नुसत्या कल्पनेनेच गावकऱ्यांच्या अंगावर काटा आला.