अव्वाच्या सव्वा दराने खरेदी : दुग्ध व्यवसायाला तडाखा
समीर भुजबळ
वाल्हे – सप्टेंबर महिना अर्धा संपत आला तरी अद्याप पुरंदर तालुक्यात पाऊस न पडल्याने, पेरणी झालेल्या शेतातील पिके आता करपू लागली आहेत. विहिरी कोरड्या पडल्या असल्याने पाण्याबरोबर जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे.
यातच चाऱ्याचे भाव गगनाला भिडले असून पावसाअभावी यंदा खरीप हंगामातील हिरवा चाऱ्याचे उत्पादन देखील घटले आहे. यावर्षी, तालुक्यातील अनेक भागात उन्हाळ्याच्या सुरूवातीलाच पिण्याच्या पाण्यासाठी टॅंकर सुरू करावे लागले होते.
सुरुवातीला रिमझीम झालेल्या पावसावर खरिपाच्या पेरण्या केल्या होत्या. पाऊस नसल्याने सुकू लागली आहे. तसेच डोंगर परिसरात अद्याप जनावरांना चरण्यासाठी चारा देखील नसल्याने, पशुधन संकटात आले आहे.
चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. शेतकऱ्यांना इतर ठिकाणाहून हिरवा चारा विकत आणावा लागत आहे. पावसाने हुलकावणी दिल्याने चारा उत्पादन कमी झाले आहे. त्याचा फटका पशुपालकांना बसत आहे.
सध्या चाऱ्याचे दर वाढले असून उसाचा दर 4 हजार रुपये टन, कडबा 5 हजार रुपये शेकडा तर घास शेकडा दर पाचशे रुपये, हिरवा मका 3 हजार पाचशे रुपये आहे. चाऱ्याचे दर दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकऱ्याचे अर्थकारणच कोलमडले आहे.
दुभत्या जनावरांसाठी आवश्यक असलेला, ताजा हिरवा चाऱ्याची देखील वाणवा आहे. मिळेल त्या ठिकाणाहून मिळेल त्या किंमतीत हिरवा चारा उपलब्ध करून घेतला जात आहे. काही शेतकऱ्यांना पाणी विकत घेण्याची वेळ आली आहे. त्यामुळे चाऱ्यासाठी अधिकचा खर्च नुकसानीत वाढ करणारा आहे.
यावर्षी पावसाने ओढ दिल्यामुळे चाऱ्याचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. पीक सुकून गेले आहे. मागच्या वर्षाचा चारा संपला आहे. त्यामुळे विकत चारा घेऊन जनावरे जगवावी लागत आहे. पाऊस झाला नाही तर जनावरे जगवावी कशी, यांचीच चिंता लागली आहे.
– जयवंत भुजबळ, दूध उत्पादक शेतकरी, वाल्हे.