दिवे (ता. पुरंदर) : प्रतवारीनुसार अंजीराचे फळ वेगळे करताना झेंडे कुटुंब.
वाघापूर – पुरंदर तालुक्यातील दिवे गावचे रहिवासी सुनील सुभाष झेंडे यांनी 200 अंजीर झाडातून लाखो रुपये उत्पन्नांचा असा अजब कारनामा केला आहे. फक्त दोन एकर शेतीत अंजिराच्या केलेल्या 200 झाडांच्या संगोपनातून सुनील झेंडे यांना वार्षिक खर्च वजा जात 9 ते 10 लाखांचा निव्वळ नफा होत असल्याचे झेंडे यांनी सांगितले.
सध्या पुरंदर तालुका हा शासन दरबारी दुष्काळी म्हणून घोषित झाला आहे. त्या धर्तीवर पुरंदर तालुक्यात पाण्याचे खूप मोठ्या प्रमाणात दुर्भिक्ष आहे. तर सुनील झेंडे यांनी कमी पाण्यात योग्य नियोजन करून आपली अंजीर बागही पोटच्या पोरासारखी सांभाळलेली आहे. आजकाल शेतकरी बर्याच ठिकाणी पाटपाण्याद्वारे फळशेतीला पाणी देताना दिसतात. पण सुनील झेंडे यांच्या अंजिराच्या बागेत कुठेही पाट दिसणार नाहीत.
प्रत्येक झाडाला पाणी देण्यासाठी ते पाइपचा वापर करतात शेतात कुठेही पाणी वाया जाऊ न देता ते झाडांना आळे करून थेट झाडांच्या आळ्यातच पाइपच्या माध्यमातून पाणी सोडतात. तब्बल 200 झाडांना पाणी देताना खूप कष्ट घेत त्यांनी ही फळशेती खूप चांगल्या प्रकारची केली आहे. तर आठ ते दहा दिवसांनी वातावरण बदलानुसार औषध फवारणी व पाण्याचे उत्कृष्ट नियोजन केले तर अंजीर शेती हा खूप चांगला पर्याय असल्याचे त्यांनी म्हटले. सुनील झेंडे हे अंजिराची सर्व फळे मुंबई येथे पाठवतात व त्यांना खूप चांगल्या प्रकारे बाजारभाव मिळत आहे.
” या शेतीत मला जेवढे कष्ट करावे लागतात त्याच पटीने माझी पत्नी पुनम झेंडे हिचा खूप मोठा वाटा आहे तिच्या सहकार्यामुळेच मी ही शेती खूप चांगल्या प्रकारे करू शकतो.” – सुनील झेंडे, अंजीर उत्पादक शेतकरी, दिवे