पुणे/कोंढवा – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पुरंदर-हवेली मतदारसंघाचे माजी आमदार अशोक टेकवडे हे घड्याळ सोडून आता कमळ हाती घेणार आहेत. भारतीय जनता पक्षामध्ये प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीमध्ये ते मंगळवारी (दि.16) प्रवेश करीत आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी कॉंग्रेसला हा मोठा धक्का मानला जात असला तरी या पक्ष प्रवेशामुळे शिंदे गटाचे माजी आमदार विजय शिवतारे आणि माजी आमदार अशोक टेकवडे नव्याने एकत्र येणार की राजकीय कलह कायम राहणार, अशी चर्चा मतदार संघात आहे.
भाजपमध्ये प्रवेश करीत असलेले अशोक टेकवडे हे 2004 मध्ये राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवारीवर आमदार झाले होते. ज्येष्ठ नेते दादा जाधवराव यांचे मोठे आव्हान त्यांनी मोडीत काढले होते. त्यानंतरच्या काळात राष्ट्रवादीकडून नवी मुंबई महापालिका निवडणुकीत दोन वेळा संधी दिल्यानंतरही अपयश आल्याने मुंबईतील एका राष्ट्रवादीच्या मोठ्या नेत्याने शिवतारे यांना मूळगावी म्हणजे पुरंदर-हवेलीमध्ये जाऊन काम करण्याचा सल्ला दिला. त्यावेळी शिवतारे हे नाव सामुदायिक विवाह सोहळ्याच्या निमित्ताने पुरंदर-हवेलीच्या घराघरात पोहचले.
परंतु, 2004 मध्ये पुरंदर-हवेलीमधून राष्ट्रवादीचे टेकवडे निवडून आल्याने 2009 मध्ये पक्ष त्यांनाच उमेदवारी देणार हे पक्के होते. याच कारणातून विजय शिवतारे यांनी 2009च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी अवघे 18 महिने अगोदर शिवसेनेत प्रवेश केला. त्याचवेळी आमदार टेकवडे यांना डावलून राष्ट्रवादीने नेते छगन भुजबळ यांच्या आग्रहातून जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष दिगंबर दुर्गाडे यांना उमेदवारी दिली, त्यावेळी पहिल्यांदा शिवतारे हे आमदार झाले, त्यावेळी शिवतारे यांच्या विरोधात टेकवडे यांनीही प्रचार केला होता. तर, शिवतारे यांनीही टेकवडे यांच्याविरोधात राजकीय बॉम्ब टाकले होते.
शिवतारे आणि टेकवडे ही नावे पुरंदर-हवेली मतदार संघातील पक्के राजकीय विरोधक म्हणून पुढे आले होते. 2019 मध्येही अशोक टेकवडे यांना संधी दिली जाईल, असे वाटत असताना राष्ट्रवादीने आघाडीचा धर्म पाळला संजय जगताप यांनी 30 हजार मतदारांनी विजय शिवतारे यांचा पराभव केल्याने पुरंदर-हवेलीमध्ये पुन्हा आघाडीला बळ आले. परंतु, दोन टर्म संधीच मिळत नसल्याने तसेच पक्षीय घुसमटीतून टेकवडे दुखावले होते. अखेर, त्यांनी राष्ट्रवादीला रामराम करीत भाजपचा रस्ता धरल्याची चर्चा आहे. तत्पूर्वी शिवतारे यांनी शिंदे गटात प्रवेश केलेला आहे. भाजप (फडणवीस) आणि शिंदे गटाचे राज्यात सरकार आहे. त्यामुळे अशा युतीत पुन्हा एकदा हे माजी आमदार एकत्र येत आहेत.
भाजपचे “बारामती मिशन’
राष्ट्रवादीला त्यांच्याच बाल्लेकिल्ल्यात मात देण्यासाठी भाजपकडून मिशन बारामती आखण्यात आले आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माजी आमदार अशोक टेकवडे यांचा भाजप प्रवेश महत्त्वाचा मानला जात आहे. टेकवडे यांचा भाजप प्रवेश हा राष्ट्रवादीसाठी मोठा धक्का मानला जात असला तरी भाजपचा मित्र पक्ष असलेल्या शिवसेना-शिंदे गटात यापूर्वीच विजय शिवतारे स्थिरावले असल्याने त्यांचे काय? असाही पेच आगामी काळात निर्माण होऊ शकतो.