शेवगाव – शेवगावमधील घटना अतिशय दुर्दैवी असून या घटनेची गंभीर दखल राज्य सरकारने घेतली आहे. यामध्ये दोषी असलेल्या व्यक्तींवर कडक कारवाई करून यामागील मास्टर माईंड शोधून काढण्यात पोलीस कुठेही कमी पडणार नाही. नागरीक आणि व्यापाऱ्यांनी न घाबरता आपले व्यवहार सुरळीतपणे सुरू करून या दहशतीला उत्तर द्यावे, तुमच्या पाठीशी शासन भक्कमपणे उभे असल्याचा दिलासा जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी सोमवारी दिला.
छत्रपती संभाजी महाराज यांच्या मिरवणुकीवर झालेली दगडफेक आणि शहरात घडलेल्या घटनांचे गांभीर्य लक्षात घेवून मंत्री विखे पाटील यांनी शेवगाव येथे येवून बाजारपेठेत झालेल्या नूकसानीची पाहाणी केली. बाजारपेठेतील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूतळ्यास पुष्पहार अर्पण करून संभाजी महाराजांच्या प्रतिमेचे पूजन केले. व्यापारी व कार्यकर्ते यांच्याशी एकत्रितपणे संवाद साधला. त्यांचे म्हणणे जाणून घेतले. महिलांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाल्याने काही कुटूंबियांना त्यांनी घरी जावून दिलासा दिला.
विखे पाटील म्हणाले की, अतिशय नियोजनबध्द पध्दतीने घडवून आणलेल्या घटनेत जो कोणी दोषी असेल त्याच्यावर कारवाई करण्याच्या सूचना पोलीस प्रशासनास दिल्या असून आठ दिवसात अतिक्रमण झेंडे फ्लेक्स बोर्ड तातडीने काढून टाकवेत. शेवगावमध्ये मावा आणि सुगंधी सुपारी मोठ्या प्रमाणात विक्री होत असल्याच्या तक्रारी पुढे आल्याने याबाबतही प्रशासनाने गंभीर दाखल घेण्याच्या सूचना यांनी दिल्या. लहान मुलांचा वापर यामध्ये करण्यात आल्याचे आश्चर्य वाटत असल्याचे नमूद करून या दहशतीला मोडण्याचे काम केल जाईल, असे ते म्हणाले.
अधिकाऱ्यांची बैठक घेवून बाजारपेठेतील अतिक्रमण अवैध व्यवसाय आणि गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तीविरोधात कठोर कारवाई करण्याच्या सूचना मंत्री विखे पाटील यांनी बैठकीत दिल्या. यावेळी आमदार मोनिका राजळे, जिल्हाधिकारी सिध्दराम सालीमठ, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, भाजपचे जिल्हाध्यक्ष अरूण मुंढे यांच्यासह स्थानिक पदाधिकारी कार्यकर्ते नागरीक उपस्थित होते.