पाटस टोल प्रशासन सुस्तावले : अपघातानंतर जाग येणार का?
यवत – पुणे सोलापूर राष्ट्रीय महामार्गावर यवत (ता. दौंड) येथे विठ्ठलचहाच्या समोरच्या बाजूस पुणे आणि सोलापूर दिशेच्या बाजूने मोठ, मोठे खड्डे पडले आहेत. याकडे पाटस टोल प्रशासन आणि महामार्ग प्रशासन मात्र डोळेझाक करीत असल्याचे चित्र दिसत आहे.
मागील महिन्यात खड्डे पडलेल्या याच ठिकाणी महामार्ग प्रशासन आणि टोल प्रशासन यांच्याकडून चप्पलने डांबर पसरविण्याचा एक जगावेगळा अनोखा प्रयोग याठिकाणी करण्यात आला होता. आता त्याच ठिकाणी मोठ, मोठे खड्डे पडले असून यामध्ये प्रवाशांचा अपघात होऊन जीव गेल्यावर या प्रशासनास जाग येणार का? अपघात होऊन प्रवाशांचा जीव जाण्याची वाट हे प्रशासन पाहत आहे, असा संतप्त सवाल प्रवासी आणि नागरिक करीत आहेत.
महामार्गवरून संत तुकाराम महाराज यांचा पालखी सोहळा दरवर्षी प्रवास करीत असतो. त्याच्या आधीच मागील काही महिन्यापूर्वी रस्त्याचे पॅचवर्कचे काम करण्यात आले होते. तरी देखील दर्जा सुमार होता.
याबद्दलचे दैनिक प्रभातने सडेतोड वृत्त प्रसिद्ध केले होते. तरीदेखील त्याच ठिकाणी पुन्हा मोठे खड्डे पडले असून त्या खड्ड्यात एक मालवाहतूक करणाऱ्या ट्रकचे पाटे तुटून ट्रक अडकला असून सुदैवाने यामध्ये कोणतीही हानी झाली नाही. मागील महिन्यात याचा ठिकाणी दुरुस्ती करण्यात आली होती. आज पुन्हा दुरुस्तीचे काम करीत आहेत. त्यामुळे दर्जा अधोरेखित होत आहे.
गुणवत्ता कोण तपासणार?
दर दोन ते तीन महिन्यांनी या ठिकाणी महामार्गाकडून दुरुस्तीची मोहीम हाती घेतली जात आहे. दुरुस्तीच्या नावाखाली भरमसाठ बिले ठेकेदारास काढली जात असल्याची जोरदार चर्चा यवत परिसरात सुरू आहे. मग त्याची गुणवत्ता आहे का व कोण तपासणार, असा प्रश्न निर्माण झाला आहे.