मतदानाला न आल्याने खासदार अमोल कोल्हे यांच्यावर नाराजी
नारायणगाव – नारायणगाव ग्रामपंचायत निवडणुकीत सत्ताधारी श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलने घवघवीत यश मिळवून 17 उमेदवार निवडून आणले; परंतु राष्ट्रवादी पुरस्कृत श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले. परिवर्तन पॅनलच्या पराभवाला अनेक कारणे असली तरी ग्रामपंचायत निवडणुकीत एक एक मत महत्त्वाचे असताना आणि नारायणगावच्या मतदारयादीत नाव असूनही खासदार अमोल कोल्हे यांनी लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होऊन मतदानाचा हक्क बजावला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी पसरली आहे.
खासदारकीच्या निवडणुकीत आपल्या नेत्यासाठी कार्यकर्त्यांनी दिवस-रात्र प्रचारासाठी जीवाचे रान करून, कुटुंबाकडे दुर्लक्ष करून प्रचार केला तोच सर्वसामान्य कार्यकर्ता एखाद्या निवडणुकीत उभा राहिल्यानंतर मतदानाचा अधिकार असतानाही त्याच्यासाठी मतदान करायचे नाही, कार्यकर्त्यांच्या पाठीशी उभे राहून त्याला बळ द्यायचे नाही, हे सर्वसामान्य कार्यकर्त्याला पटलेले नाही. मग कार्यकर्त्यांनी आयुष्यभर फक्त नेत्याच्या सतरंज्याच उचलायच्या का? अशी चर्चा कार्यकर्ते करू लागले आहेत.
ग्रामपंचायत निवडणूक पक्षीय राजकारणावर होत नसली तरी डॉ.अमोल कोल्हे यांनी स्वतःच्या गावात मतदानासाठी उपस्थित राहून स्वतःच्या पक्षातील कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवले असते तर कार्यकर्त्यांना ऊर्जा मिळाली असती; परंतु खासदारांना सर्वसामान्य कार्यकर्ता मोठा होऊ द्यायचा नाही, अशी चर्चा रंगू लागली आहे. निवडणुकीच्या काळात स्टेजवर लोकशाहीचा उत्सव सांगून मतदारांनी मतदान केले पाहिजे, असा सांगण्याचा अधिकार नेत्यांना राहतो का? असाही प्रश्न सर्वसामान्य कार्यकर्ता व मतदाराला पडू लागला आहे.
सहकारमंत्री वळसे पाटलांचा आदर्श घ्यावा
राज्याचे सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील कामाचा व्याप असतानाही वेळात वेळ काढून स्वतःच्या गावी निरगुडसर येथे येऊन ग्रामपंचायत निवडणुकीत मतदानाचा हक्क बजावला. ज्या कार्यकर्त्यांच्या जीवावर मी निवडून येतो, त्यातून उतराई होण्याचा थोडासा प्रयत्न केला तो आदर्श डॉ. अमोल कोल्हे यांनी घ्यायला हवा, असे कार्यकर्ते बोलू लागले आहेत.