राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथ मंत्री जयंत पाटील यांचे गौरवोद्गार
राजगुरूनगर येथे कार्यक्रमात वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव
राजगुरूनगर – लोकांना रोखठोक वाटणारे नेतृत्व म्हणजे दिलीप मोहिते पाटील आहेत, असे प्रतिपादन राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष तथा जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी येथे केले.
खेडचे आमदार दिलीप मोहिते पाटील यांच्या वाढिवसानिमित्ताने आयोजित कार्यक्रमासाठी जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील शुभेच्छा देण्यासाठी उपस्थित होत, त्यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील, आमदार महेश लांडगे, आमदार निलेश लंघे, सुरेखा मोहिते पाटील, जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे, जिल्हा बॅंकेचे अध्यक्ष डॉ. दिगंबर दुर्गाडे, दूध संघाचे संचालक अरुण चांभारे, कैलास सांडभोर, विजय डोळस, प्रा. डॉ. शिवाजीराव मोहिते, सुरेश कौदरे आदी मान्यवर आणि असंख्य नागरिक उपस्थित होते.
जलसंपदा मंत्री जयंत पाटील म्हणाले, एक स्पष्ट बोलणारा आमदार म्हणून दिलीप मोहिते पाटील यांच्याकडे पहिले जाते. कोणी काही बिघडवले तर ते त्याला ताठ पणाने जाब विचारणारा आमदार आहे. वावग कधी खपवून घेण्याची पद्धतच नाही, कोणाचा शब्द पडू देत देण्याची व्यवस्थाच नाही. त्यामुळे लोकांना रोखठोक वाटणारे नेतृत्व म्हणून आमदार दिलीप मोहितेंकडे पहिले जाते. प्रसंगी कटू वाटणारे अण्णा शांत स्वभावाचे आहेत. त्यांचे हृदय मऊ आहे. तालुक्यातील नागरिकांच्या हिताचे निर्णय घेणारे नेतृत्व लाभले आहे, आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने त्यांचे राजकीय कारकीर्द अजून बहरेल अशा शुभेच्छा दिल्या.
“वाढदिवसाला आल्यावर द्यायचे असते’
वाढदिवसाला आल्यावर द्यायचे असते. आमदार दिलीप मोहिते पाटील यांनी तालुक्यातील प्रश्न सोडविण्यासाठीची जलसंपदा विभागाचा मंत्री म्हणून ज-जे मागितले आहे. त्यापैकी 99 टक्के देण्याचा प्रयत्न करील. प्रत्येक पुरुषाच्या मागे एक समर्थ स्त्री असते. खेड विधानसभा मतदारसंघात जेवढे काम अण्णा करतात तेवढे काम त्यांच्या मागे सुरेखाताई करत आहेत, म्हणून त्यांचे अभिनंदन करतो. यावेळी पाटील यांनी राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या राज्यातील कार्यकर्त्यांच्या वतीने आमदार दिलीप मोहिते पाटील यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.
आमदार मोहितेंच्या मंत्र्यांकडे मागण्या
* तालुक्यात 3 नगरपालिका विकास आराखडा मंजूर करून त्यांचा कायापालट करण्याचा मानस आहे.
* चास कमान धरणातील चास कमान कालव्याचे अस्तरीकरण करण्यासाठी निधी द्या
* कालव्यावरील जुने लोखंडी पूल नादुरुस्त झाले तेथे कॉंक्रीटचे साकव पूल बांधायला निधी द्या.
* खेड तालुक्यातील पोलीस ठाण्याअंतर्गत गावातील भौगोलिक सर्वेक्षण करून पोलीस ठाणे कोठे असावे याबाबत निर्णय घ्यावा व बदल करावा
* अनेक गावे पिंपरी-चिंचवड आयुक्तालयात गेली आहेत, त्यामुळे नागरिकांची गैरसोय होते.
* पोलीस ठाण्यात चांगले अधिकारी मिळावेत.
खेड तालुक्यातील जनतेने मोहिते पाटील यांच्यावर प्रेम केले. सरकारच्या माध्यमातून, पक्षाच्या माध्यमातून त्यांनी तालुक्यात मोठी विकासकामे केली, शरद पवारांच्या नेतृत्वाखाली धरणे, एमआयडीसी झाली आता रेल्वे होत आहे. सर्वच क्षेत्रात तालुक्याची प्रगती झाली आहे, यात दिलीप मोहिते पाटील यांचे योगदान मोठे आहे. खूप काही केले खूप काही करायचे असे अण्णांनी सांगितले. तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी व सर्वसामान्य माणसाच्या जीवनात बदल घडविण्यासाठी त्यांच्या पाठीशी आपण सर्वांनी ठामपणे उभे राहावे.
– दिलीप वळसे पाटील, गृहमंत्री
जनतेने पाठराखण केली म्हणून रचनात्मक काम करीत खेड तालुका पुढे नेण्याचे काम केले. तालुक्याच्या विकासासाठी खूप काही केले अजूनही खूप काही करायचे बाकी आहे. अनेक विकासकामे जनतेच्या आशीर्वादाने मार्गी लावता आली. तालुक्यातील सर्व कार्यालये एका छाताखाली आणणारी प्रशासकीय इमारतीला विरोधकांनी अडचण निर्माण केली; मात्र जयंत पाटील याबाबत मार्ग काढतील.
– दिलीप मोहिते पाटील, आमदार, खेड-आळंदी विधानसभा मतदारसंघ