रेडा -इंदापूर तालुक्यामध्ये वार्षिक सरासरीपेक्षा सर्वाधिक असा 140 टक्के अधिक पाऊस झाला आहे. त्यामुळे शेतातील खरीप पिके, फळबागा, चारा पिके वाया गेली आहेत. वादळी पावसाने ऊस पिक जमिनीवर लोळल्याने मोठे नुकसान झाले आहे. त्यामुळे शेतकरी वर्ग आर्थिक संकटात सापडला आहे. संततधार पावसाने शेती जलमय झाली आहे. त्यामुळे अडचणीत आलेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शासनाने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करावा, अशी मागणी भाजपचे नेते हर्षवर्धन पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे पत्र पाठवून केली आहे.
इंदापूर तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी फक्त 525 मिलिमीटर एवढी आहे. आज अखेर (दि.14) तालुक्यात वार्षिक सरासरीपेक्षा एकूण 1247 मिलिमीटर विक्रमी पाऊस झाला आहे. वेधशाळेने आणखी परतीच्या पावसाचा अंदाज व्यक्त केला आहे. अतिवृष्टीमुळे तालुक्यातील शेतकरी हवालदिल झाला आहे.
एका दिवसात 65 मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झाल्यास अतिवृष्टी समजली जाते. यंदा तालुक्यात आठ ते नऊवेळा अतिवृष्टी झाली आहे.
त्यामुळे आपत्तीग्रस्त शेतकरी व नागरीकांना दिलासा देण्यासाठी शासनाने इंदापूर तालुक्यात ओला दुष्काळ जाहीर करण्याची आवश्यकता आहे, असे त्यांनी नमूद केले आहे. शासनाने अतिवृष्टीने नुकसान झालेली खरीप पिके, फळबागा, चारा पिके व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना तातडीने नुकसान भरपाई द्यावी. रब्बी व इतर पिके घेण्यासाठी शेतकऱ्यांना एकरी 15 हजार रुपयांची आर्थिक मदत करावी, अशीही मागणी या पत्रात केली आहे. शासनाने तातडीने इंदापुरात ओला दुष्काळ जाहीर करण्याचे आदेश द्यावेत, अशी मागणी त्यांनी केली आहे.