सातारा -भारतीय हवामान खात्याने 13 ते 17 ऑक्टोंबर या कालावधीत बहुतेक ठिकाणी विजेच्या गडगडाटासह जोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तविली आहे. या अतिवृष्टीच्या कालावधीत जिल्ह्यातील नागरिकांनी दक्षता घ्यावी, असे आवाहन जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणामार्फत करण्यात आले आहे.
आवश्यकता नसल्यास नागरिकांनी मुसळधार पावसात घराबाहेर पडणे टाळावे. घराबाहेर अथवा असुरक्षित ठिकाणी असल्यास पाऊस थांबेपर्यंत सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा. पाऊस पडत असताना विजा चमकत असल्यास नागरिकांनी झाडाखाली उभे राहू नये. मोबाईलवर संभाषण करू नये आणि इलक्ट्रिक वस्तूपासून दूर राहावे.