भोर – शासनाने इंदापूर, बारामती, पुरंदर या तालुक्यांत दुष्काळ जाहीर केला असल्यामुळे या दुष्काळाच्या नावाखाली नीरा देवघर, भाटघर धरणातील पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात सुरु असल्यामुळे भोर तालुक्यातील धरणाच्या पाण्यावर असणाऱ्या पाणी पुरवठा योजनांवर पाणी टंचाईचे संकट ओढवणार आहे.
दोन्ही धरणांचा पाण्याचा विसर्ग बंद करावा. अन्यथा या भागातील संतप्त नागरिक आंदोलन करतील, असा इशारा शासनास, जलसंपदा विभाग पुणे यांना आमदार संग्राम थोपटे यांनी लेखी निवेदनाद्वारे दिला आहे. भोर येथील रायरेश्वर डोंगरी विकास परिषदेच्या कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
आमदार थोपटे म्हणाले की, भोर विधानसभा मतदारसंघात एकूण ९ धरण प्रकल्प असून ८२ टिएमसी एवढा पाणी साठा उपलब्ध होतो. भाटघर व नीरा-देवघर धरणे असून धरणातील पाण्याचे नियोजन कालवा सल्लागार समितीमार्फत होत असते. परंतु कालवा सल्लागार समितीचे यावर्षीचे आवर्तनाचे नियोजन पाहता भाटघर धरणाची पाणी पातळी मागील वर्षीच्या तुलनेने यंदा 20 टक्के, तर नीरा देवघर धरणाचा 30 टक्क्यांने झपाट्याने कमी झाला आहे.
धरणांच्या पाण्याच्या विसर्गाची परिस्थिती अशीच सातत्याने राहिली. पूर्व-पश्चिम भागातील गावांना दोन्ही धरणांच्या पाणी पुरवठयाच्या योजनांना भविष्यात काही महिन्यांमध्ये पाणी उपलब्धततेच्या टंचाईला सामोरे जावे लागणार आहे. शेतीची आवर्तने देखिल दोन्ही धरणांच्या आवर्तनावर अवलंबून आहेत. त्याचप्रमाणे दुष्काळाच्या यादीत भोर तालुक्यातील वेळू, संगमनेर व भोर या तीन मंडळांपैकी संगमनेर व भोर मंडळामधील नीरा-देवघर आणि भाटघर धरण भागातील अनेक गावे आहेत.
भोर शहराचा पाणीपुरवठा भाटघर धरणावरून होत असून जर या दोन्ही धरणांतील पाणी जादा प्रमाणावर सोडले तर या भागातील स्थानिकांना पाणी टंचाईच्या समस्येला सामोरे जावे लागणार आहे. लोकप्रतिनिधी या नात्याने माझ्याकडे स्थानिक नागरिक आवर्तनाबाबत तक्रारी घेऊन येत आहेत. आवर्तनांमुळे शेतकरी, नागरिक भयभीत झालेले असून पाणी उपलब्धतेच्या बाबतीत स्थानिकांच्या मनामध्ये शंका निर्माण होत आहे.
या दोन्ही धरणातील आवर्तनाव्दारे जादा प्रमाणात सोडण्यात येणारे पाणी तातडीने बंद करण्यात यावे. याबाबत आमदार थोपटे यांनी जलसंपदा विभागाला निवेदन देऊन मागणी केली आहे. धरणातील पाण्याचा विसर्ग ताबडतोब बंद केला नाही तर लोकप्रतिनिधी या नात्याने तीव्र आंदोलन करण्याचा इशारा आमदार थोपटे यांनी दिला आहे.
दोन्ही धरणाच्या उजव्या-डाव्या कालव्या अस्तरीकरणाची कामे रखडले आहेत. यामुळे कालव्यांची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झालेली आहे. संबंधित विभाग कालव्याला पाणी न सोडता धरणाच्या वीज निर्मिती केंद्राच्या तळ मोरीतून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरू ठेवून धरणाचे पाण्याची पातळी झपाट्याने कमी करीत आहे. अस्तरीकरणाच्या कामासाठी शासनाकडे वेळोवेळी निधीसाठी पाठपुरावा करीत आहे.
परंतु निधी वेळेत उपलब्ध होत नसल्यामुळे कालव्यांची दुरावस्था झाली आहे. अधिकाऱ्यांवर राजकीय दबाव टाकून नीरा देवघर, भाटघर धरणातील पाणी पूर्व पट्ट्यात पळवले जात आहे. ऑक्टोंबर महिन्यात पालकमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली पाणी वाटपाबाबत कालवा समितीची बैठक घेण्यात येत असते. त्या समितीवर सचिव म्हणून अधिकारी, सदस्य म्हणून आमची नेमणूक केली जाते. परंतु बैठकीचे अचानक निमंत्रण देऊन बैठकीस उपस्थित राहता येत नाही.
यामुळे संबंधित विभागावर नाराजी व्यक्त करीत असून पाणी वाटप हे शेतीच्या खरीप व रब्बी हंगामातील पिकांसाठी केली जाते. मात्र, खरीप हंगामात भोर- वेल्हा तालुक्यात मोठ्या प्रमाणात पाऊस असल्यामुळे या आवर्तनाची गरज नसून ही गरज रब्बी हंगामातील पिकांना वाढवून मे महिन्याच्या शेवटपर्यंत देण्यात यावी, अशी मागणी आमदार थोपटे यांनी केलेले आहे.
सातारा जिल्ह्यातील धोम-बलकवडी उजव्या कालव्यावरील पाण्यावर भोर तालुक्यातील वीसगाव, चाळीसगाव खोऱ्यातील अनेक गावांचे शेती क्षेत्र ओलिताखाली असून मात्र या कालव्याला धरणातून आवर्तन न सोडल्यामुळे या भागातील शेतकऱ्यांच्या रब्बी हंगामातील पिके पाण्याअभावी सुकू लागलेली आहेत. पिण्याच्या पाण्याचे विहिरींची पाणीपातळीत घट होत असल्यामुळे पाणी टंचाईची समस्या होत आहे. तरी धरणाच्या उजव्या कालव्याला पाणी सोडण्यात यावी अशी मागणी आमदार थोपटे यांनी सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे केली आहे.