इतरांचेही गाळप अंतिम टप्प्यात ः तोडणी कामगारांची गावाकडे कूच
रमेश जाधव
रांजणी – पुणे जिल्ह्यातील 16पैकी 11 साखर कारखान्यांची धुराडी बंद झाली आहेत. यंदा उसाचे प्रमाण जास्त असल्याने बहुतांशी साखर कारखाने दरवर्षीपेक्षा जास्त काळ चालले. यंदा उन्हाचा चटका वाढल्याने साखर कारखान्यांचा गळीत हंगाम देखील लांबला; परंतु आता उसाचे क्षेत्र संपत आल्याने कारखान्याची धुराडी बंद होऊ लागली आहेत. त्यामुळे ऊस तोडणी कामगार आपापल्या गावाकडे परतू लागले आहेत.
उन्हाचा चटका वाढल्याने जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा हंगामदेखील आता संपत आला आहे. आतापर्यंत जिल्ह्यातील 11 साखर कारखाने बंद झाले असून येत्या आठ ते पंधरा दिवसात उर्वरित साखर कारखाने देखील बंद होतील, अशी माहिती पुणे प्रादेशिक सहसंचालक कार्यालयाच्या सूत्रांनी दिली. दरम्यान उन्हाच्या झळा तीव्र झाल्याने पाणी टंचाईने तीव्र स्वरूप धारण केले आहे. विहिरींनी तळ गाठला आहे. पाणीटंचाईमुळे जनावरांसाठी आवश्यक चाऱ्याची कमतरता देखील भासू लागली आहे.
साखर कारखान्यांनी हा महिन्यांपूर्वी उसाचे गाळप सुरू केले होते. यंदा गळीत हंगामात जिल्ह्यात 16 साखर कारखाने सुरू झाले. त्यातच उसाचे क्षेत्र अधिक असल्याने सहा महिन्यांपासून साखर कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू होता. त्यामुळे कारखाना कार्यस्थळावर चांगलीच धावपळ पाहायला मिळाली. किराणा दुकाने, हॉटेल यांचाही उस हंगामात तेजीत धंदा सुरू होता. आता गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असल्याने अनेक कारखाने बंद झालेत. कारखाना कार्यस्थळावर हॉटेल दुकानातील ग्राहकांच्या संख्येत देखील घट झाल्याचे चित्र दिसून येते.
दरम्यान गेल्या काही दिवसांपासून पूर्व मोसमी पावसासाठी पोषक वातावरण तयार झाले आहे. त्यातच खरीप हंगाम सुरू होण्यासाठी काही दिवसांचाच अवधी शिल्लक आहे. ऊस तोडणी कामगारांना गावाकडे जाऊन खरीप पूर्व शेताच्या मशागतीची कामे करण्याची लगबग आहे. त्यामुळे त्यांनी देखील घराच्या परतीची वाट धरली आहे.
या कारखान्यांच्या हंगामाची सांगता
जिल्ह्यात एकूण सहकारी दहा आणि खाजगी सहा साखर कारखाने सुरू झाले होते. या कारखान्यांची दैनंदिन गाळप क्षमता अडीच ते साडेसात हजार मेट्रिक टन होती. अजून काही दिवस साखर कारखाने चालू रहाण्याची शक्यता वर्तविण्यात येते. बंद झालेल्या साखर कारखान्यांमध्ये कर्मयोगी, शंकरराव पाटील, संत तुकाराम, घोडगंगा, भीमाशंकर, नीरा-भीमा, छत्रपती, श्रीनाथ मस्कोबा, अनुराज शुगर, दौंड शुगर, व्यंकटेश कृपा शुगर आणि पराग शुगर कारखान्याचा समावेश आहे.