नीरा- सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून कर्नलवाडी (ता. पुरंदर) येथे बैलगाडा पळवण्याचा डाव जेजुरी पोलिसांनी हाणून पाडला आहे. तर बैलगाडासह पोबारा करणारी दोन वाहने पोलिसांनी पाठलाग करून पकडली असून 11 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातीचल चौघांना ताब्यात घेतले असताना त्यांची जामिनावर सुटका झाली असून नऊ जण फरार असल्याची माहिती जेजुरी पोलिसांनी दिली.
धनंजय बाबुराव दगडे (रा. नीरा, ता. पुरंदर), हेमंत आदित्य काकडे (रा. निंबूत, ता. बारामती), अधिक आनंदराव चव्हाण (रा. कोऱ्हाळे, ता. बारामती), बापूराव लक्ष्मण लकडे (रा. निंबूत, ता.बारामती) असे जामीन मिळालेल्यांची नावे आहेत. तर अय्याज हबीब सय्यद (वय 33, रा. नीरा, ता .पुरंदर), राहुल सुधाकर खलाटे (वय 31, रा. लाटे ता. बारामती), प्रवीण बाळासाहेब पोकळे, रामा मदने, सत्तरभाई सय्यद (तिघे रा. नीरा, ता. पुरंदर), अमर जाधव (रा. निंबूत, ता.बारामती), संदीप निगडे (रा. गुळूंचे, ता. पुरंदर) असे फरार झालेल्यांची नावे आहेत. पोलीस कॉन्स्टेबल निलेश जाधव यांनी फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेली अशी की, कर्नलवाडी येथील वाघजाई पठारावर बैलगाडा शर्यत भरविण्यात येत आहे, अशी माहिती शनिवारी (दि. 26) दुपारी 12 वाजण्याच्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे यांना मिळाली. त्यामुळे त्यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. त्यावेळी काहीलोक गड्यास जुंपलेले बैल पळण्याच्या तयारीत असल्याचे दिसले.
मात्र, पोलीस आल्याने त्या लोकांनी आपल्या बैलगाडासह तेथून पोबारा केला. मात्र, पोलिसांनी पाठलाग करून पिकअप (एमएच 42 एम 6986) व गाडीचे मालक अधिक चव्हाण, व पिकअप (एमएच 12 एफ 5540) मालक बापूराव लकडे यांना पकडले, असे फिर्यादीत नमूद केले आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक अंकुश माने यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक विजय वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस नाईक राजेंद्र भापकर करीत आहेत.