नारायणगाव – मतदानाच्या दिवशीच आम्हाला मिळणारा प्रतिसाद बघून आमचा विजय निश्चित झाला होता. आम्हाला मिळणारा प्रतिसाद बघून विरोधक वाद घालू लागले; परंतु आम्ही अत्यंत संयमाने विकासाची कामे मतदारांना समजावून सांगितली त्यामुळे आम्हाला यश मिळाले. पुढील पाच वर्षांत नारायणगावच्या विकासाची बुलेट ट्रेन धावणार असल्याचे आश्वासन नारायणगावचे माजी सरपंच सरपंच बाबू ऊर्फ योगेश पाटे यांनी दिले.
नारायणगाव (ता. जुन्नर) ग्रामपंचायत निवडणुकीत माजी सरपंच बाबू ऊर्फ योगेश पाटे व पॅनल प्रमुख संतोषनाना खैरे यांच्या श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलने 17 जागांवर विजय मिळवत ग्रामपंचायतीवर आपले वर्चस्व सिद्ध केले आहे. तर श्री मुक्ताई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनलला केवळ एका जागेवर समाधान मानावे लागले आहे.
लोकनियुक्त सरपंच पदावर श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनलच्या डॉ. शुभदा वाव्हळ यांनी 7449 मते मिळवून परिवर्तन पॅनलच्या छाया केदारी यांचा 3 हजार मताधिक्यांच्या फरकाने पराभव केला.नारायणगाव ग्रामपंचायत निवडणूक चुरशीची होणार असे वाटत असताना श्री मुक्ताबाई हनुमान ग्राम विकास पॅनलने विकासाच्या मुद्द्यावर निवडणूक लढवून दैदिप्यमान यश मिळवले.
“नारायणगावच्या जनतेने विकासाला मते दिली असून त्यामध्ये महिला कार्यकर्त्यांचा मोठा सहभाग लाभला. विरोधकांनी केवळ विरोधासाठी विरोध केला. पुढील पाच वर्षांत दिलेली आश्वासने पूर्ण करून नारायणगावला विकासाकडे नेणार.” – संतोषनाना खैरे, पॅनल प्रमुख
विजयी उमेदवार
श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास पॅनल : वार्ड एक : आरिफ आतार, सविता पाटे. वॉर्ड दोन : भावना बेल्हेकर, ज्योती कुतळ, संतोष दांगट. वॉर्ड तीन : अश्विनी गभाले, भागेश्वर डेरे. वॉर्ड चार : योगेश पाटे, छाया बिरमल, सुचिता क्षीरसागर. वॉर्ड पाच : सुप्रिया अडसरे, हेमंत कोल्हे, शारदा बाळसराफ. वॉर्ड सहा : गणेश पाटे, प्रिया खैरे, जालिंदर खैरे. श्री मुक्ताबाई हनुमान ग्रामविकास परिवर्तन पॅनल : जुबेर आतार . नोटा 627 मते मिळाली.
आचारसंहितेच्या भंगाची चौकशी होणार
नारायणगाव येथे पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकीच्या आचारसंहिता भंगाच्या चार तक्रारी दाखल करण्यात आल्या होत्या. त्यापैकी दोन तक्रारींचे अर्ज मागे घेण्यात आले. उर्वरित दोन तक्रारींचे चौकशी होणार असल्याचे तहसीलदार रवींद्र सबनीस यांनी सांगितले.