खराबवाडी (ता. खेड) : वाहतूककोंडीच्या विषयावर आयोजित बैठकीत उपस्थित ग्रमस्थ, अधिकारी.
महाळुंगे इंगळे – तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर नित्याची वाहतूक कोंडी फोडण्यासाठी अन् झोपलेल्या लोकप्रतिनिधी व प्रशासनाला जागे करण्यासाठी आता स्थानिक गावातील ग्रामस्थ एकवटले आहेत. वाहतूक कोंडी व रस्ता रुंदीकरणाचा प्रश्न गांभीर्याने घेतला नाही, तर जनआंदोलन उभारू व येत्या लोकसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकू, असा इशारा पंचक्रोशीतील ग्रामस्थांनी दिला आहे.
चाकण औद्योगिक वसाहतीचा कणा म्हणून ओळखल्या जाणार्या तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्त्यावर रोजच्या वाहतूक कोंडीमुळे अक्षरशः स्थानिक ग्रामस्थ मेटाकुटीला आले असताना त्याकडे मात्र लोकप्रतिनिधी व प्रशासन साफ दुर्लक्ष करताना दिसत आहे. याच मुद्द्यावर आवाज उठविण्यासाठी खराबवाडी (ता. खेड) येथे मंगळवारी (दि. 26) आयोजित बैठकीत वरील इशारा देण्यात आला आहे.
यावेळी महेंद्र मेदनकर, गणेश नाणेकर, रावसाहेब नाणेकर, हनुमंत देवकर, संतोष खराबी, शशीकांत कड, विष्णू आप्पा कड, सुदर्शन देवकर, मनोज खराबी, जयवंत कड, सुनिल कड, बाप्पा जोगदंड, किरण किर्ते, विलास बिरदवडे, आशिष ढगे पाटील, विश्वनाथ केसवड, सुशील गजशिव, किरण कड आदी मान्यवर व ग्रामस्थ उपस्थित होते.
या बैठकीला चाकण वाहतूक विभाग व महाळुंगे वाहतूक विभागाचे प्रतिनिधीही उपस्थित होते. या बैठकीत माणिक, चाकण-तळेगाव, मेदनकरवाडी, राणूबाई मळ्यातील सद्गुरूनगर फाटा, आंबेठाण, वाकी भाम, सारा सिटी, वाघजाईनगर, बिरदवडी येथील बाबुराव पवार शाळेसमोरील आदी चौकांच्या ठिकाणच्या वाहतूक नियोजनातील त्रुटी दूर करण्याची मागणी स्थानिक ग्रामस्थांनी वाहतूक विभागाला केली. त्याचबरोबर काही ठिकाणी वाहतूक विभागाचे कर्मचारी दिसून येत नाहीत त्यावर पण लक्ष देण्याची विनंती ग्रामस्थांनी केली.