जुन्नर – शेतात पाणी सोडण्यासाठी पाण्याची मोटार सुरू करण्याच्या प्रयत्नात येणेरे (ता. जुन्नर) येथील एका युवकाचा मृत्यू झाला. ही घटना शनिवारी (दि. 8) घडली असून संतोष लक्ष्मण घोगरे (वय 31) या युवकाला या दुर्घटनेत प्राण गमवावे लागले.
घराशेजारील विहिरीतील मोटार सुरू होत नसल्यामुळे संतोष दुसरी मोटार सुरू करण्यासाठी धरणाकडे आला. मात्र ही मोटारही सुरू होत नसल्याने त्याने मोटारीचा विद्युत प्रवाह बंद करून तारेचा जोड (जॉइंट) तपासण्यासाठी पाण्यात उतरला. नंतर पाण्यातील मोटारीची तार त्याने पकडली व ती पकडत तो बाहेर आला. येथे असलेल्या एका लाकडी खांबाला अनेक मोटारींच्या तारा गुंडाळलेल्या होत्या. येथे त्याला एका तारेचा जोड निघाल्याचे आढळले.
ती तार आपलीच असल्याचे समजून त्याने ती जोडण्यासाठी हात लावला. त्या क्षणाला त्याला विजेचा धक्का बसला आणि तो गतप्राण झाला. त्याने पाण्यात उतरताना त्याच्या मोटारीचा वीजप्रवाह बंद केला होता, परंतु नजरचुकीने दुसऱ्या तारेला हात लावल्यामुळे ही दुर्घटना घडली. सरपंच अमोल भुजबळ व गावकऱ्यांनी त्यांना तातडीने जुन्नर ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आणले, मात्र उपचारापूर्वीच त्यांचे निधन झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले. त्यांच्या मागे पत्नी, दोन मुले, भाऊ, आई, वडील असा परिवार आहे.
जीवावर उदार होऊन…
जुन्नर तालुक्यातील विविध धरणे किंवा पाणीसाठ्यावर मोठ्या संख्येने शेतकऱ्यांच्या मोटारी असतात. त्यात किंवा वायरिंगमध्ये बिघाड झाल्यास अनेकदा शेतकरीच जीवावर उदार होवून पाण्यात जातात. मोटारीची तार शोधून ती वायरमनकडे बाहेर आणण्यात येते. आणि मग ती जोडली जाते. मात्र या वेळी शेतकरी, वायरमन केवळ त्यांच्या स्वतःच्या मोटारीचा वीजपुरवठा खंडित करतात. अशावेळी खांबावरील सर्व प्रवाह विद्युत खात्याकडून बंद करून घ्यावा, मग काम करावे. तसेच शेतकऱ्यांनी विजेचे जोड उघडे ठेवू नयेत, त्यांना वॉटरफ्रुफ आवरण लावावे, असे आवाहन महामंडळाने केले आहे.