ओतूर -ओतूर गावात 22 मार्च ते आजपर्यंत लॉकडाऊन कालावधीत दिवंगत झालेल्या सुमारे 21 व्यक्तींना प्राणास मुकावे लागले. त्यांच्या परिवाराच्या दुःखात ग्रामस्थांना त्या-त्या वेळी सहभाग घेता आला नाही, म्हणून ओतूर येथील जिजाऊ सोशल फाउंडेशन आयोजित सर्व ग्रामस्थांनी सामूहिकरित्या गावचे मुख्य व्यासपीठ पांढरी मारुती मंदिरासमोर सामूहिक श्रद्धांजली वाहिली.
तत्पूर्वी जुने बसस्थानक ते मारुती मंदिरापर्यंत कॅंडल मार्च काढण्यात आला. ‘माणसाने माणसाशी माणसा सम वागणे’ ही प्रार्थना घेण्यात आली. व्याख्यात्या शारदा मुंढे यांनी मार्गदर्शन केले. दुःखद घटना घडलेल्या परिवारातील सदस्यही या प्रसंगी उपस्थित होते. सोशल डिस्टनसिंगचे पालन करून नागरिक या शोकसभेत सहभागी झाले.
कार्यक्रमाच्या निमित्ताने वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञ डॉक्टर, नर्स, आशा वर्कर्स, साफसफाई कामगार, शिक्षक, अंगणवाडी सेविका, पोलीस कर्मचारी, प्लाझ्मा डोनर, रुग्णवाहिका चालक, रक्तदाते या सर्व योद्ध्यांचा प्रातिनिधिक स्वरूपात सन्मान करण्यात आला. स्व गुलाबअण्णा डुंबरे यांचे स्मरणार्थ त्यांचा मुलगा नितीन डुंबरे यांनी जिजाऊ सोशल फाउंडेशन या संस्थेला 5 हजार रुपये रोख स्वरूपात देणगी दिली. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.