1 मार्च पासून पाणी सोडणार – आमदार बेनके
पॉईंतर : पिंपळगाव जोगा धरणातून उद्यापासून आवर्तन
नारायणगाव – कुकडी प्रकल्पातून 1 मार्चपासून 38 दिवसांसाठी आवर्तन सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुन्नर तालुक्यातील जनतेला पाऊस पडेपर्यत पाण्याची कमतरता पडणार नाही, असे नियोजन केले असल्याचे आमदार अतुल बेनके यांनी नमूद केले.
पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली कुकडी कालवा सल्लगार समितीच्या पुणे येथे झालेल्या बैठकीत वरील निर्णय घेण्यात आला.यावेळी सहकारमंत्री दिलीप वळसे पाटील, आमदार रोहित पवार, जलसंपदा विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
बैठकीत पिंपळगाव जोगा धरण्याच्या पाण्याचे आवर्तन सोमवारी (दि.26) तारखेपासून सोडण्यात येणार असून ते 40 दिवसांचे असणार आहे. तथापि यंदाचा कडक उन्हाळा, कमी झालेला पाऊस त्यामुळे कुकडी प्रकल्पात पाण्याचा साठा कमी असून पाण्याचा काटकसरीने वापर करण्याचे आवाहन बेनके यांनी केले.
त्यातच उन्हाळ्याचे आवर्तन पूर्व भागातील सात तालुक्यात द्यावे लागणार असल्याने जुन्नर तालुक्यातील शेतकरी पाण्यासाठी संकटात येण्याची शक्यता आहे असे सांगितले. सध्या कुकडी प्रकल्पात 15.930 टीएमसी म्हणजेच 53.65 टक्के इतकेच पाणी शिल्लक आहे. सध्याचा पाणीसाठा विचारात घेता उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्याची देखील चणचण भासणार आहे. त्यामुळे पूर्व भागातील कर्जत, करमाळा, शिरूर, पारनेर, शिगोंदा तसेच जुन्नर व आंबेगाव तालुक्यातील जनतेला पाणी फारच जपून वापरावे लागणार आहे.
कुकडीत सध्या पाण्याचा साठा अवघा 53.65 टक्के इतकाच आहे. त्यामुळे उन्हाळ्यात पूर्व तालुक्यासाठी एक अवर्तन पाण्याचे सोडले जाऊ शकते. त्यामुळे चार महिने पाणी जपून वापरावे लागणार आहे. उन्हामुळे होणारे पाण्याचे बाष्पीभवन, कालव्यांची दुर्दशा व पाणी गळतीचा फटका मोठ्या प्रमाणात बसू शकतो.
– प्रशांत कडूसकर, कार्यकारि अभियंता, जलसंपदा विभाग, कुकडी पाटबंधारे विभाग क्र. 1