आळंदीतील वस्तूस्थिती ः दिशादर्शक फलक लावले मात्र अर्धवट माहितीचे
आळंदी-श्रीक्षेत्र आळंदी येथे तीर्थक्षेत्र विकास आराखड्यानुसार कामे पूर्णत्वाकडे जाण्याच्या मार्गावर असली तरी ती संथ गतीने सुरू आहेत. 25 टक्के कामे अजून बाकी आहे आहेत.
नुकतेच तीर्थक्षेत्र विकास आराखड्यांतर्गत श्री क्षेत्र आळंदी येथे प्रत्येक मार्गावर दिशादर्शक फलक शासनाच्या वतीने लावण्यात आले आहेत; मात्र त्यात अर्धवट माहिती असल्याचे दिसून येत आहे, अशी तक्रार आता भाविक व नागरिक करू लागले आहेत.
शासनाच्या वतीने चाकण चौक, भैरोबाचौक, प्रदक्षिणा मार्ग, श्री लक्ष्मी माता चौक, मरकळ रोड, नगर परिषद चौक, चऱ्होली रस्ता, वडगाव घेनंद रस्ता आदी ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. या फलकांवर गावांची नावे व जाणाऱ्या मार्गाकडे बाण दाखवण्यात आले आहेत. ज्या गावाकडे जाणारा दिशादर्शक फलक आहे, त्या गावाचे अंतर किती असावे असे फलकावर दिसत नाही. याच प्रमाणे सर्व ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आले आहेत. त्यामुळे संबंधितांना आळंदीपासून बाहेर जाणाऱ्या गावांचे अंतर नेमके किती आहे? हे दर्शविणे गरजेचे होते.
श्री क्षेत्र आळंदी येथे चांगदेव महाराजांच्या भेटीची स्थान विश्रांती वड, पुरातन पद्मावती देवी मंदिर, सिद्धबेट, श्रीज्ञानेश्वर महाराजांनी चालवलेली भिंत, गुजराती बांधवांचे प्रसिद्ध असे जलाराम बापा मंदिर, इंद्रायणी काठी असणारे वैताग ईश्वर मंदिर, केंद्रे महाराजांचे श्री ज्ञानेश्वरी मंदिर, मांडे भाजलेले ठिकाण, श्री संत जनाबाई मंदिर व इतर पाहण्यासारखी ठिकाणे यांचा उल्लेख कोठेही तीर्थक्षेत्र विकास आराखड्यातील दिशादर्शक फलकात दिसून येत नसल्याने आळंदीतील नागरिकांसह भाविकांमध्ये देखील नाराजीचा सूर आहे.