पुणे – लोकाभिमुख उपक्रमं राबवून परिसरातील सामाजीक सलोखा अबाधित ठेवण्यात यशस्वी ठरलेले भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय कुंभार यांची विशेष शाखेत बदली झाली. त्यांनी आणखी काही दिवस पोलीस ठाण्यात कार्यरत रहायला हवे होते अशी भावना अनेक सामाजीक संघटनांकडून व्यक्त करण्यात आली. दरम्यान त्यांनी बालगुन्हेगारांचे समुपदेश करुन पुर्नवसनासाठी केलेल्या प्रयत्नांचे स्थानिक नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.
पाच लाख लोकसंख्या असलेल्या भारती विद्यापीठ पोलिस ठाण्याअंतर्गत शांतता व कायदा, सुव्यवस्था राखण्यात वरिष्ठ पोलिस निरिक्षकाची कसोटी लागते. यामुळे येथे दोन गुन्हे पोलीस निरीक्षक आहेत. त्यांच्याशी समन्वय ठेवत लोकसंखेच्या प्रमाणात कर्मचार्ऱ्यांची संख्या नसताना कायदा सुव्यवस्था अबाधिक राखण्यासाठी अधिकार्यांना कसरत करावी लागते. त्यासाठी नागरीकांशी सतत संवाद साधून सामाजिक उपक्रम आणि जनजागृती करण्यावर कुंभार यांनी भर दिला. थेट जनसंपर्कात राहून सामाजिक वीण घट्ट करणार्या अधिकार्याची बदलीमुळे नागरिक हळवे झाले होते. दरम्यान त्यांनी काही कौटुंबिक कारणामुळे स्वत:हून बदलीसाठी अर्ज केल्याचे सांगण्यात आले.
गुन्हेगारीकडे वळणारी पावले रोखली
भारती विद्यापीठ परिसरातील बालगुन्हेगारीचे प्रमाण लक्षात घेऊन, त्यांनी बालगुन्हेगारांच्या समुपदेशनासाठी पुढाकार घेतला होता. त्यांनी तब्बल जवळपास 200 बालगुन्हेगार तसेच बालगुन्हेगारीचे आकर्षण असणाऱ्यांचे समुपदेशन केले. यामुळे गुन्हेगारीकडे वळणारी अनेक पावले चांगल्या मार्गाकडे वळाली. त्यांनी प्रशिक्षण देऊन 18 वर्षे पुर्ण केलेल्या 14 जणांना रोजगार आणि सात जणांना तांत्रीक प्रशिक्षण दिले.