हडपसर – पुणे-सोलापूर महामार्गावर हडपसर मध्ये रस्त्यावर अपघात होण्याचे प्रमाण अलिकडे वाढले आहे. अनेक वाहनचालक स्वतःचा जीव वाचवत वाहन चालवीत आहे. मात्र, काही महाभाग वाहनचालक असे असतात की स्वतःच्या जीवासह इतरांच्या जिवालाही धोका पोहोचेल अशा प्रकारचे कृत्य करतात. त्याचाच एक नमुना सोमवारी ( दि. ६) दुपारी बाराच्या दरम्यान पाहायला मिळाला.
हडपसर गाडीतळ ते रामटेकडी या रस्त्यावर एक वाहन चालक दुचाकीवर प्लास्टिकच्या चटईचा गठ्ठा आणि त्यावर एक जोडीदार बसवून घेऊन जात होता. मात्र, हवेच्या दाबाने गाडी चालवणे या वाहनचालकाला कठीण जात होते. तरीही तो कसाबसा रस्त्याने जाण्याचा प्रयत्न करत होता. अशा वाहन चालकाकडे वाहतूक पोलिस कधी लक्ष देणार असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत. शेवाळेवाडी फाटा, लक्ष्मी कॉलनी चौक, पंधरा नंबर चौक, आकाशवाणी, गाडीतळ आणि मगरपट्टा चौक याठिकाणी बेशिस्त वाहतूक वाढली आहे.
त्यामुळे सध्या वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून वाहन चालवावे लागत आहे. मात्र, एक दुचाकीस्वार तुटपुंजे भाडे वाचविण्याच्या नादात किंवा दुचाकीवरूनच व्यावसाय करण्याच्या हेतूने चटईचा गठ्ठा आणि त्यावर जोडीदार घेऊन जात आहे. हवेचा दाब येत असल्याने वाहन चालकाला मोठी कसरत करावी लागत होती. मागचे वाहने पुढच्या गाडीवाल्यांना ओव्हरटेक करताना चटईच्या गाठल्यावरून तो तरुण पडेल की काय या भीतीने अनेकवाहनचालक त्या दुचाकीच्या पाठीमागे जात होते.
खरेतर आणि चौकात वाहतूक पोलिस आपल्या कर्तव्यावर असतात. मात्र, अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यापेक्षा जे वाहन चालक सिग्नलवर उभे असतात, अशा वाहनचालकांवर कारवाई करण्याचा कल असतो. खरेतर नियमबाह्य वाहन चालकावर कठोर कारवाई होणे हे गरजेचे आहे.
अशामुळे अपघाताच्या प्रमाणात घट होईल. वाहतूक पोलिस स्वयंशिस्त पाळून रांगेत जातात त्यांना अडवून विविध तपासण्या करतात. मात्र, स्वतःसह इतरांचा जीव धोक्यात घालून वाहन चालविणाऱ्या वाहन चालविताना वाहतूक पोलिस सोडून देतात. त्यामुळे दुचाकीवर अशा प्रकारे वस्तू वाहतूक करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाई करण्याची मागणी सर्वसामान्य नागरिक करीत आहेत.