पुणे – भिशीमध्ये पैशांची गुंतवणूक केल्यास चांगला परतावा देण्याचे आमिष दाखवून एका कुटूंबियाने व्यावसायिक महिलेला तब्बल २३ लाख ७५ हजारांचा गंडा घातला आहे. ही घटना डिसेंबर २०१५ ते जून २०२१ कालावधीत घडली.
याप्रकरणी मेलूकूलम श्रीनिवासन, सीमा श्रीनिवासन आणि वरूण श्रीनिवासन सर्व (रा. केरळ ) यांच्याविरूद्ध खडकी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ज्योती अगरवाल (वय ४७, रा. उंड्री ) यांनी तक्रार दिली आहे.
फिर्यादी ज्योती हॉटेल व्यावसायिक असून आरोपी श्रीनिवासन यांची नोंदणीकृत कंपनी आहे. ओळखीतून त्यांनी भिशी लावण्याची विनंती अगरवाल यांच्याकडे केली होती. त्यानुसार बोली भिशीतून जादा परतावा मिळण्याच्या अपेक्षेने ज्योती यांनी श्रीनिवासन यांच्या भिशीत ४७ लाख ५० हजारांची गुंतवणूक केली होती.
त्यातील अर्धी रक्कम श्रीनिवास यांनी ज्योती अगरवाल यांना परत केली. मात्र, लॉकडाउनमुळे उर्वरित रक्कम देण्यास श्रीनिवासन कुटूंबियांना अपयश आले. त्यामुळे आरोपींनी ज्योती अगरवाल यांची फसवणूक केल्याच्या तक्रारीनुसार त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी तपास सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक अमोल भोसले यांनी दिली आहे.