पुणे – कराेनामुळे रुग्णाचा मृत्यू झाला तर मृतदेह अंत्यसंस्कारासाठी नातेवाइकांकडे देण्यात येणार आहे. याबाबतचा निर्णय नुकताच काेविड टास्क फाेर्सने घेतला आहे. त्यामुळे नातेवाईकांना आता मृतदेह मिळविताना होणारा त्रास कमी होणार आहे.
राज्यात कराेनाचा पहिला रुग्ण ९ मार्च २०२० मध्ये आढळला हाेता. तेव्हापासून गेल्या सुमारे चार वर्षांत कराेनामुळे आतापर्यंत ८१ लाख रुग्ण पाॅझिटिव्ह आढळून आले आहेत. त्यापैकी १ लाख ४८ हजारांहून अधिक मृत्यू झाले आहेत. आतापर्यंत करोनामुळे जेवढे मृत्यू झाले त्या सर्वांचा अंत्यविधी संबंधित यंत्रणेने म्हणजे ज्या दवाखान्यात मृत्यू झाला त्या भागातील नगरपालिका, महापालिकेकडे अंत्यविधीची जबाबदारी हाेती. मात्र, आता ते करण्याची गरज नाही.
कोविड रुग्णांचे मृतदेह अंत्यसंस्कारासाठी महापालिकेला, नगरपरिषदेकडे अंत्यविधीसाठी देण्याची आवश्यकता नसून इतर आजाराने मृत्यू पावलेल्या व्यक्तींप्रमाणेच त्यांचे मृतदेह नातेवाइकांकडे देण्यात यावेत, असे नुकत्याच डॉ. रमण गंगाखेडकर यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या काेविड टास्क फाेर्सच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. करोना मृतदेहामुळे करोना पसरत नाही, यावर काेविड टास्क फाेर्सचे एकमत झाल्याने हा निर्णय घेण्यात आला आहे.