पुणे – पुणे-बंगळुरू राष्ट्रीय महामार्ग सलग सहाव्या दिवशीही बंद ठेवला आहे. कोल्हापूर जिल्ह्याच्या हद्दीत महामार्गावर 3 फुटांपर्यंत पाणी असल्याने वाहतूक बंद ठेवली आहे. तसेच, सद्यःस्थितीत मुंबई, पुण्याहून जाणारी वाहतूक किणीवाठारपर्यंतच सुरू आहे.
कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात पूरस्थिती निर्माण झाल्यामुळे मागील 6 दिवसांपासून वाहतूक पूर्णपणे बंद ठेवली आहे. रस्त्यारून वाहणारे पाणी संथ गतीने कमी होत आहे. शनिवारी रात्रीपासून पाण्याची पातळी अर्धा ते पाऊण फुटाने कमी झाली. मात्र, अद्यापही तीन ते साडेतीन फूट पाणी महामार्गावर आहे. यामुळे वाहतूक पूर्णपणे बंद असल्याने कोल्हापूरात अत्यावश्यक सेवा बोटीतूनच पुरविली जात आहे. महामार्गावरील पाण्यातून अवजड वाहतूक करता येणे शक्य नाही. या ठिकाणी पाण्याचा वेग वाहतुकीसाठी सुरक्षित नसल्याचे दिसत आहे. सांगली फाटा येथे पाण्याला वेग जास्त असल्याने अद्यापही धोकादायक स्थिती असल्याने महामार्गावरून वाहतूक बंद ठेवली आहे, अशी माहिती स्थानिक पोलीस प्रशासनाने दिली.