पुणे –करोनाच्या तिसऱ्या लाटेचे संकट घोंघावत असतानाही काही बेजबाबदार व्यक्ती विनामास्क फिरत आहेत. त्यामुळे संसर्ग कायम आहे. त्यावर प्रशासन दंडात्मक कारवाई करत आहे.
जिल्ह्यात आतापर्यंत विनामास्क फिरणाऱ्या तब्बल 9 लाख 71 हजार 582 व्यक्तींवर कारवाई करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 45 कोटी 56 लाख 15 हजार रुपयांचा दंड वसूल झाला आहे. यात एकट्या पुणे शहरात 27 कोटी 70 लाख रुपये वसूल करण्यात आले आहेत.
करोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेतही कठोर निर्बंध लावण्यात आले. मात्र, त्या काळातही काही नागरिक विनामास्क फिरताना आढळले. तसेच रस्त्यावर थुंकणाऱ्यांवर मनपा, नगरपालिका, पोलीस आणि ग्रामपंचायत स्तरावर अशा बेशिस्तांवर कारवाई अजूनही केली जात आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात 1 लाख विनामास्क फिरणाऱ्यांवर कारवाई करून तब्बल 5 कोटींचा दंड वसूल केला आहे.
नियम पाळाच
सध्या बाजारपेठांतील गर्दी लक्षात घेता मास्क, सॅनिटायझर हेच आपल्याला संसर्गापासून रोखू शकतात. मात्र, मास्क न वापरणाऱ्या काही बेजाबदार नागरिकांमुळे करोनाचा संसर्ग आटोक्यात येत नसल्याचे कारवाईवरून दिसून येते. त्यामुळे तिसरी लाट थोपवण्यासाठी नियम पाळण्याचे आवाहन केले जात आहे.