ना. रामराजे; पाल येथे स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन उत्साहात
फलटण (प्रतिनिधी) – छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रथम पत्नी व छत्रपती संभाजीराजेंच्या मातोश्री छत्रपती सौ. सईबाई राणीसाहेब यांची समाधी पुणे जिल्ह्यातील पाल (ता. वेल्हे) या गावात आहे. वर्षे हा समाधी परिसर अनेक वर्षे दुर्लक्षित होता. छत्रपती सौ. सईबाई यांच्या स्मारकाच्या माध्यमातून पालचा पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार असल्याची ग्वाही विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.
छत्रपती सईबाई यांच्या 365 व्या पुण्यतिथीनिमित्त त्यांच्या स्मारकाच्या कामाचे भूमिपूजन ना. रामराजे यांच्या हस्ते नुकतेच झाले. सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य संजीवराजे नाईक निंबाळकर, अरविंद पासलकर, पालचे सरपंच गोरख शिर्के, कुलदीप कोंडे, बापूसाहेब धुमाळ, करणसिंह बांदल, अण्णा देशमाने, दत्ताजी नलावडे, प्रदीप मरळ, सौरभ आमराळे, अमोल पाटणकर उपस्थित होते.
ना. रामराजे म्हणाले, इतिहासात छत्रपती सईबाईंबाबत चार ओळींपेक्षा अधिक काही लिहिले गेले नसल्याची खंत माझ्या मनात कायम आहे. त्यांच्या स्मारकाची जबाबदारी आता मी घेतली आहे. या कामासाठी गावकऱ्यांची मदत लागणार आहे. फलटणला ऐतिहासिक वारसा आहे.
फलटण तालुक्यातील मुरुम हे मल्हारराव होळकरांचे जन्मस्थान आहे. संजीवराजे म्हणाले, मावळचा इतिहास वेगळा सांगायची गरज नाही. इतिहासाच्या खाणाखुणांचे जतन केले नाही, तर त्या काळाच्या ओघात गडप होण्याची शक्यता आहे. साहसी, पराक्रमी, चारित्र्यसंपन्न, अनन्यसाधारण राजे म्हणून छत्रपती शिवाजी महाराज ओळखले जातात. शत्रूसुद्धा त्यांच्या चारित्र्यावर संशय घेऊ शकत नव्हता.
छत्रपती सईबाईंच्या पुढच्या स्मरणदिनी हे स्मारक पूर्ण होण्यासाठी आपण काम करूया. प्रतापगडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा मालोजीराजे नाईक निंबाळकर यांनी बसवला. तो पाहण्यासाठी लोक लांबून येतात, त्याचप्रमाणे छत्रपती सईबाईंचे स्मारक पाहण्यास पर्यटक येतील. गणेश खुटवड-पाटील यांनी प्रास्ताविकात स्मारकाची माहिती दिली. स्मारकाचे वास्तुरचनाकार अमोल पाटणकर यांचा सत्कार रामराजे यांच्या हस्ते करण्यात आला.