पुणे – कोरोनाच्या वाढत्या प्रादुभार्वामुळे शहरात पुन्हा सोमवार (दि. 28) पासून संचारबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे दररोज संध्याकाळी पाच ते पहाटे पाच वाजेपर्यंत नागरिकांनी विनाकारण भटकंती करता येणार नाही.
अत्यावश्यक सेवा वगळता घराबाहेर फिरणाऱ्यांविरूद्ध कारवाईचा बडगा उगारण्यात येणार आहे. त्यापार्श्वभूमीवर पोलिस प्रशासनाने ठिकठिकाणी नाकाबंदी केली आहे. नागरिकांनी पोलिस प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन सहपोलीस आयुक्त डॉ. रवींद्र शिसवे यांनी केले आहे.
कोरोना रूग्णांची वाढती संख्या आणि साखळी तोडण्यासाठी कडक निर्बध लागू करण्यात आले आहेत. त्यामुळे नागरिकांनो घरातच बसा, विनाकारण भटकंती करू नका, अन्यथा दंडात्मक कारवाईचा इशारा पोलिसांनी दिला आहे. नाकाबंदीदरम्यान बेशिस्त आणि विनाकारण वाहनचालकांविरूद्ध दंडात्मक कारवाई केली जाणार आहे.
शहरात पुन्हा संचारबंदी लागू करण्यात आल्यामुळे पोलिसांनी बेशिस्तांविरूद्ध कारवाईची मोहिम हाती घेतली आहे. त्यानुसार जागोजागी नाकाबंदी, पेट्रोलिंग आणि चेकिंगला प्राधान्य दिले आहे. अत्यावश्यक सेवा वगळता इतरांना फिरण्यास बंदी घालण्यात आली आहे.