पुणे – मुंबई – बंगळुरू राष्ट्रीय महामार्गावरील नऱ्हे येथील स्वामीनारायण मंदिराजवळ झालेल्या अपघातातानंतर ट्रकला लागलेल्या आगीत केबिन मधील ४ जणांचा होरपळून मृत्यू झाल्याची घटना सोमवारी रात्री नऊच्या दरम्यान घडली. या प्रकरणाची प्राथमिक माहिती समोर आली असून ट्रक चालकाच्या चुकी आणि बेजबाबदारपणामुळे जणांचा मृत्यू झाल्याचे पोलिसांनी सांगितले.
या अपघातात यास्मीन सलमान पठाण (वय-२९), अमन सलमान पठाण (वय-११), ट्रक चालक गोविंद तुकाराम जाधव (वय-३२), क्लिनर सोमनाथ मल्लापा निळे (वय-४२, दोघेही रा. वळसंग, ता. जत. जि. सांगली) यांचा होरपळून मृत्यू झाला. याप्रकरणी सुनील कोळी (वय-२७, रा. विनोदे वस्ती, हिंजेवाडी) याने सिंहगड पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे. नानासो खोत या घटनेत जखमी झाले आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, यातील फिर्यादी सुनील कोळी, यास्मिन पठाण, तिचा मुलगा अमन पठाण आणि नानासो खोत हे इस्लामपूर येथील पेठ नाका येथून ट्रक क्र एमएच १० सीआर ८८९९ मध्ये बसले होते. ट्रक चालक गोविंद जाधव हा कात्रज बोगदा संपल्यावर भरधाव वेगाने आणि बेदरकारपणे ट्रक चालवत होता.
नर्हे येथील स्वामी मंदिरासमोर आल्यावर ट्रक चालक गोविंद जाधव याने अचानक लेन बदलून बाजूने जाणाऱ्या एमएच १४ इएम ७८८३ या कंटेनरला पाठीमागून जोराची धडक दिली. यामुळे हा कंटेनर पलटी झाले.
ट्रकने कंटेनरला धडक दिल्याने ट्रक चालकाचे नियंत्रण सुटले यामुळे दुसऱ्या कंटेनरला ट्रकने पाठीमागून जोराची धडक दिली. यानंतर ट्रक जागेवरच थांबला व ट्रकच्या केबिनला आग लागली. यावेळी केबिन मध्ये एकूण ६ जण होते. यातील यास्मीन पठाण, अमन पठाण, ट्रक चालक गोविंद जाधव, क्लिनर सोमनाथ निळे यांच्या जागेवरच आगीत होरपळून मृत्यू झाला.
सुनील आणि यास्मीन लवकरच करणार होते लग्न; मात्र त्यापूर्वीच काळाने घातला घाला –
सुनील कोळी हा मुलाचा सांगली जिह्यातील असून मागच्या काही वर्षांपासून हो हिंजेवाडी येथे सुरक्षा रक्षकाचे काम करत होता. यास्मीन गावाकडे राहत होती. यास्मीन पठाणचे लग्न झाले असून तीला ११ वर्षाचा मुलगा आहे. मात्र पती नांदवत नसल्याने ती मुलासोबत राहत होती. यामुळे सुनील कोळी आणि यास्मीन यांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला होता. काही दिवसांपूर्वी सुनील हा गावी गेला होता. यास्मीनला पुण्यात आणून तिच्याशी तो लग्न करणार होता. मात्र त्यापूर्वीच यास्मीन आणि तिच्या मुलावर काळाने घाला घातला.