पुणे – अभियांत्रिकीचे शिक्षण पूर्ण करून महापालिकेच्या माध्यमातून पुणेकरांच्या सेवेत रुजू झालेल्या स्थापत्य अभियंत्यांच्या “अशिक्षित’ कारभारामुळे पुणेकरांना प्रत्येक पावसाळ्यात रस्त्यावर खड्डे आणि साचलेल्या पाण्याचा सामना करावा लागत आहे. यंदाच्या पावसाळ्यातही हे चित्र शहरभर कायम आहे.
पावसाळ्यात रस्त्यावर पाण्याची डबकी साचू नयेत म्हणून गेल्या काही वर्षांत पुणे महापालिकेने अनेक रस्त्यांवर शेकडो कोटी रुपये खर्च केले. पावसाळी गटारे बांधली आहेत. रस्त्यावर पाणी न साचता ते या गटारांमधून वाहून जावे, हा या मागचा उद्देश असला तरी यासाठी रस्ते डांबरीकरण करताना, दुरुस्त करताना त्यांचा उतार या पावसाळी गटारांच्या मॅनहोलकडे राहील, याची दक्षताच घेतली जात नसल्याचे समोर आले आहे. पावसाळी वाहिन्या असूनही त्यात पाणीच जात नसल्याचा प्रकार शहरात अनेक भागात दिसून येत आहे.
महापालिका ही कामे ठेकेदारांकडून करून घेत असली तरी काम झाल्यानंतर त्याची तपासणी संबंधित विभागाच्या अभियंत्यांनी करणे अपेक्षित असते. हे अभियंते केवळ ठेकेदारांची बिले रंगविण्यातच धन्यता मानत असल्याने शहरभर पाण्याची तळी साचत असल्याचे वास्तव पुन्हा एकदा समोर आले आहे.
उतार एकीकडे, तर चेंबर भलतीकडेच!
महापालिकेने रस्त्याच्या कडेला पावसाळी वाहिन्या टाकल्यानंतर रस्त्यावर साठणारे पावसाचे पाणी या वाहिनीत जाण्यासाठी रस्त्यावर मॅनहोल तसेच चौकोणी चेंबर तयार करण्यात आले आहेत. हे चेंबर लोखंडी जाळीचे असल्यास ते चोरी होत असल्याने महापालिकेने ते सिमेंटचे लावण्याचा निर्णय घेतला आहे. प्रत्यक्षात रस्त्याचा उतार आणि ज्या बाजूने पाणी साचते त्या सखल भागात हे चेंबर असणे आवश्यक आहे. मात्र, ते अनेकदा भलतीकडेच केले जातात.
त्यापेक्षाही वाईट बाब म्हणजे, भविष्यात रस्त्यांचे डांबरीकरण केल्यानंतर हे चेंबर एकतर परस्पर वर उचलले जाते अथवा जिथे सखल भाग आहे, तो उंच केला जातो. परिणामी, या चेंबरमध्ये पावसाचे पाणीच जात नाही. त्यामुळे रस्त्यांचे डांबरीकरण अथवा कोणतेही दुरुस्ती करताना रस्त्याचा उतार आणि चेंबर लक्षात घेणे आवश्यक असताना त्याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने अनेक रस्त्यांवर पाण्याची तळी साचत आहेत.
बिगारीच करतात अभियंत्यांचे काम
प्रत्यक्षात महापालिका ही कामे ठेकेदारांकडून करून घेत असली तरी तांत्रिक बाबींसाठी कामाच्या वेळी अभियंता प्रत्यक्ष कामाच्या ठिकाणी उपस्थित असणे आवश्यक आहे. मात्र, ठेकेदार अनेक कामांसाठी एकच अभियंता ठेवत असल्याने हे अभियंते बिगाऱ्याला काम समजावून निघून जातात. त्यामुळे बिगारी कोणताही विचार न करता काम संपविण्याचा प्रयत्न करतात. परिणामी लाखो रुपयांचा खर्च करूनही समस्या तशाच राहतात.
महापालिका प्रशासनाने शहरातील ज्या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचते त्या ठिकाणांचा तातडीने सर्व्हे करावा. ज्या रस्त्यावर पावसाळी गटारे बांधली असूनही पाणी साचते आहे, त्याचा अर्थ कामात कुचराई झाल्याचे स्पष्ट होते. त्यास कंत्राटदार व महापालिकेच्या संबंधित अधिकाऱ्याला जबाबदार धरुन त्यांच्यावर कारवाई करावी, असे सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले.