मुंबई – महात्मा गांधींसह देशातील महापुरूषांबद्दल आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्य केल्याबाबत संभाजी भिडे यांच्याविरोधत मुंबई उच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल करण्यात आली आहे. या याचिकेवर मुख्य न्यायमूर्ती देवेंद्रकुमार उपाध्याय आणि न्यायमूर्ती आरिफ डॉक्टर यांच्या खंडपीठासमोर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
प्रसारमाध्यमं आणि समाजमाध्यमांतून प्रसिद्ध केल्या जाणाऱ्या महापुरुषांबाबतच्या आक्षेपार्ह आणि बदनामीकारक वक्तव्यांबाबतचा प्रसार रोखण्यासाठी काही मार्गदर्शक तत्त्वे तयार करण्याची प्रमुख मागणी या याचिकेतून केली गेली आहे.
तसेच महापुरूषांची बदनामी करणाऱ्यांची यादी तयार करून त्यांना प्रसारमाध्यमे किंवा समाजमाध्यमांतून अपमानास्पद टिप्पणी करण्यापासून मनाई करण्याचे आदेश राज्य सरकारला देण्याचे मागणीही याचिकाकर्त्यांनी याचिकेत केली आहे.
अब्रुनुकसानी, मानहानीशी संबंधित भारतीय दंड संहितेतील 499 आणि 500 ही दोन्ही कलमं या समस्येला सामोरे जाण्यासाठी अपुरी पडत असल्याचा दावा याचिकाकर्त्यांनी केला आहे.
त्यामुळे मूलभूत अधिकारांशी संबंधित घटनेतील अनुच्छेद 14 आणि 21चे उल्लंघन करणाऱ्या भादंविचे 499 आणि 500 ही दोन्ही कलम रद्द करा, अशी मागणीही या याचिकेत करण्यात आली आहे.