नवी दिल्ली – बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करणे एका महिलेला चांगलेच महागात पडले आहे. या प्रकरणी अलाहबाद उच्च न्यायालयाने महिलेला 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. महिलेने चार पुरुषांविरोधात बलात्कार आणि अनैसर्गिक शरीर संबंध बळजबरीने प्रस्थापित केल्याचा खोटा आरोप करत तक्रार दाखल केली होती.
या प्रकरणी सुनावणी न्या. अंजनी कुमार मिश्रा आणि न्या. विवेक कुमार सिंग यांच्या खंडपीठासमोर सुनावणी पार पडली. खंडपीठाने म्हटले की, याचिकाकर्ता 1 आणि आरोप करणारी महिला याचे लग्न झाले आहे. दोघेही सज्ञान असून त्यांनी त्यांच्या मर्जीने लग्न केले आहे. दोघेही पती-पत्नी म्हणून एकत्र राहतात, मात्र त्यांच्यात मतभेद झाल्यानंतर महिलेने रागाच्या भरात खोटी बलात्काराची खोटी तक्रार दाखल केली आहे.
महिलेकडून अशा प्रकरणात तक्रार दाखल करणे आणि बलात्काराचा खोटा आरोप करणे गंभीर आहे. यामुळे महिलेला 10 हजार रुपयांचा दंड ठोठाविण्यात येत आहे. तसेच अशा प्रकरणांचा निपटारा कठोर पद्धतीने करणे गरजेचे असून न्यायालयाने चार पुरुषांकडून दाखल केलेली रिट याचिका स्विकारली आहे.
याशिवाय महिलेने कलम 376, 377, 313, 406 आणि 506 अन्वये दाखल केलेली तक्रार रद्द केली आहे. महिलेने दाखल केलेली तक्रार आमच्या विरोधात केलेले खोटे आरोप आहेत, असे म्हणत पुरुषांकडून रिट याचिका दाखल करण्यात आली होती.