नवी दिल्ली – आपण जेंव्हा 2019 मध्ये पीएम सन्मान निधीची घोषणा केली तेंव्हा यांना निवडणूकच हायजॅक करायची आहे, असे बोलले गेले. मात्र माझी हमी ही निवडणुकीतील आश्वासने नसतात. मी जेंव्हा एखादी हमी देतो तेंव्हा ती पूर्ण करूनच दाखवतो. पीएम किसान सन्मान निधी अंतर्गत आतापर्यंत 2 लाख 60 हजार कोटी रूपये थेट खात्यात जमा करण्यात आले आहेत असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.
हरियाणाच्या फरिदाबाद येथील सूरजकुंड येथे भारतीय जनता पार्टीचे दोन दिवसांचे पंचायत राज परिषद संमेलन सुरू आहे. त्याला उद्देशून मोदी यांनी भाषण केले आणि यावेळी उपस्थित कार्यकर्त्यांना ग्रामीण भागाकडे विशेष लक्ष देण्याचा सल्लाही दिला. पाच पाच गावांचा एक गट स्थापन करून तेथील लोकांना केंद्र सरकारच्या योजनांची माहिती दिली जावी अशा सूचना त्यांनी केल्या.
मोदी म्हणाले की आपल्याकडे जे यूरिया शेतकऱ्यांना 300 रूपयांत मिळते आहे ते जगातल्या अनेक भागांत तीन हजारपेक्षा जास्त किमतीत मिळते आहे. सरकार शेतकऱ्यांवर कोणताही बोजा पडू न देता स्वत: तो बोजा उचलते आहे. पीक विमा योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना 1 लाख 30 हजार कोटींची भरपाई देण्यात आली आहे.