नवी दिल्ली – केंद्रीय अर्थ मंत्री निर्मला सीतारामन यांनी आज अर्थसंकल्प सादर करताना ईशान्य प्रदेशासाठी “पीएम-डिव्हाईन’ या नवीन विकास योजनेची घोषणा केली.
“पीएम-डिव्हाईन’ची अंमलबजावणी ईशान्य परिषदेच्या माध्यमातून केली जाईल. या नवीन योजनेसाठी सुरुवातीला 1,500 कोटी रुपयांची तरतूद केली जाईल. पंतप्रधान गतिशक्ती योजनेच्या अनुशंगाने पायाभूत सुविधा आणि ईशान्य प्रदेशच्या गरजांवर आधारित सामाजिक विकास प्रकल्पांना या अंतर्गत निधी पुरवला जाईल. यामुळे तरुण आणि महिलांसाठी उपजीविकेची सोय होईल, विविध क्षेत्रातील तफावत दूर करता येईल, असे अर्थमंत्र्यांनी स्पष्ट केले.
मात्र सध्याच्या केंद्र किंवा राज्य योजनांना तो पर्याय असणार नाही. केंद्रीय मंत्रालये देखील त्यांचे स्वतःचे प्रकल्प सादर करू शकतात, परंतू राज्यांनी मांडलेल्या प्रकल्पांना प्राधान्य दिले जाईल, असे सितारामन यांनी सांगितले.