नवी दिल्ली – राज्यसभेत आज एका कम्युनिस्ट पक्ष सदस्याच्या प्रश्नाला उत्तर देताना महिला आणि बालकल्याण मंत्री स्मृती इराणी यांनी म्हटले आहे की देशातील प्रत्येक विवाह हिंसक असतो आणि प्रत्येक पुरूष बलात्कारी असतो असे मानता येणार नाही.
विवाहसंबंधातील बलात्कार या विषयावर एक पुरवणी प्रश्न कम्युनिस्ट नेते बिनॉय विश्वम यांनी विचारला होंता त्याला उत्तर देताना त्यांनी वरील विधान केले. आयपीसीच्या कलम 375 मध्ये आणि घरगुती हिंसाचाराच्या कलम 3 मध्ये आपण लक्ष घातले आहे काय अशी विचारणाही त्यांनी केली होती.
त्यावर उत्तर देताना स्मृती म्हणाल्या की, प्रत्येक विवाह हा हिंसाचारच असतो असे समजून त्याचा निषेध करणे हितावह नाही. प्रत्येक पुरूष बलात्कारी नसतो ही बाबही या बाबतीत ध्यानात ठेवायला हवी. या विषयावर अधिक भाष्य करणे मला उचित वाटत नाही आणि हा विषय सध्या न्यायप्रविष्ठ आहे त्यामुळेही मी त्यावर अधिक बोलणार नाही असे त्या म्हणाल्या.
महिला हित रक्षणासाठी सरकारने केलेल्या अन्य उपाययोजनांची माहितीहीं त्यांनी यावेळी दिली. त्या म्हणाल्या की राज्य सरकारांच्या मदतीने देशात 30 हेल्पलाईन कार्यरत आहेत आणि त्यातून 66 लाख महिलांना मदत करण्यात आली आहे. महिलांना मदत करण्यासाठी देशात 703 वन स्टॉप सेंटर्सही सुरू आहेत असे त्यांनी सांगितले. देशातील महिला व बालकांच्या हिताचे रक्षण करणे ही सर्वांचीच जबाबदारी आहे, तरीही प्रत्येक विवाहाकडे हिंसाचार म्हणून पाहणे हितावह नाही असे मला आवर्जून सुचवायचे आहे असेही त्यांनी नमूद केले.
भाजपचे सुशिलकुमार मोदी यांनी सभागृहात प्रश्न विचारला होता की पती-पत्नी संबंधांमध्ये पुरूषाने संभोगासाठी जबरदस्ती केली तर अशा प्रकरणात त्या पुरूषाच्या कृतीच्या विरोधात बलात्काराचा गुन्हा नोंदवण्यास सरकार राजी आहे काय?. त्याच अनुषंगाने कम्युनिस्ट पक्षाचे विश्वम यांनी हा प्रश्न विचारला होता.