रांची –झारखंडमध्ये अवैध उत्खननावेळी कोळसा खाणी कोसळून तीन महिला आणि एक मुलगी मिळून चौघी जणी मृत्युमुखी पडल्या. त्या दुर्घटनेत कोसळलेल्या ढिगाऱ्यांखाली अनेक जण अडकल्याची शक्यता वर्तवली जात आहे. झारखंडच्या धनबाद जिल्ह्यात असणाऱ्या खाणी सोमवार सायंकाळ ते मंगळवार सकाळपर्यंतच्या कालावधीत कोसळल्या. त्यानंतर तातडीने बचाव कार्य हाती घेण्यात आले. खाणकाम करणाऱ्या कंपन्यांकडून ते कार्य सुरू करण्यात आले.
खाणी कोसळल्याची माहिती समजल्यानंतर पोलीस आणि प्रशासकीय अधिकारी घटनास्थळी पोहचले. गोंधळाच्या स्थितीमुळे दुर्घटनेविषयी तातडीने तपशीलवार माहिती मिळू शकली नाही. मृतांचा आणि ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा नेमका आकडा सांगण्यास पोलीस आणि प्रशासकीय अधिकारीही असमर्थ ठरले. मात्र, खाणींमध्ये प्रवेश करण्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने पादत्राणे आढळली. त्यामुळे कोसळलेल्या खाणींमध्ये अनेक कामगार अडकल्याचा अंदाज आहे. दरम्यान, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांनी खाण दुर्घटनांमधील जीवितहानीबद्दल दु:ख व्यक्त केले. बचाव कार्यावर ते देखरेख ठेऊन आहेत.