लखनौ : उत्तर प्रदेशमधील अनेक जिल्ह्यात सुधारीत नागरिकत्व कायद्याच्या (का) विरोधातील निदर्शने थांबवण्यात पोलिसांना यश आले असले तरी सहा शहरात अद्याप निदर्शने सुरू आहेत. लखनौसह काही शहरात वेगवेगळ्या ठिकाणी निदर्शने सुरु आहेत.
लखनौ येथील ऐतिहासिक क्लॉक टॉवरजवळ मोठी निदर्शने सुरू आहेत. ती 17 जानेवारीला सुरू झाली आहेत. शाहीन बाग येथील आंदोलनापासून स्फूर्ती घेत महिलांनी ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. येथील निदर्शकांची संख्या कधीच रोडावली नाही. मंगळवारी पुलवामा हल्ल्याच्या प्रथम स्मृती दिनी दोन मिनिट शांतता पाळून हुतात्म्यांना श्रध्दांजली वाहण्यात आली तर व्हॅलेटाईन डे दिवशी मुशायऱ्याचे आयोजन आंदोलन स्थळावर करण्यात आले आहे.
लखनौच्या उजारीगावमध्ये आणखी एक महिलांच्या समुहाने ठिय्या मारला आहे. आम्ही सीएए विरोधातील निदर्शने सुरू ठेवली आहेत. ती मागे कोणताही विचार केला नाही. नागरीकत्व कायदा सरकार मागे घेईपर्यंत निदर्शने मागे घेणार नाही. उलट आमची संख्या वाढत आहे, असे या आंदोमनात सहभागी झालेल्या सायरा या गृहीणीने सांगितले.
या दोन्ही आंदोलनाच्या ठिकाणी हिंदू आणि शिख बांधवांकडून आंदोलकांच्या भोजनासाठी लंगर आयोजित करण्यात येतात. सतिंदरजित सिंग हा शिख व्यावसायिक म्हणाला, आम्ही निदर्शनासाठी बसू शकत नाही. कारण आमच्यामागे व्यवसायाचे व्याप आहेत. पण आंदोलन करणाऱ्या महिलांच्या पोटात वेळच्या वेळी अन्नाचे दोन घास जातील, एवढी व्यवस्था तरी आम्ही करू शकतो.
प्रयागराजमध्ये मन्सूर अली पार्क या रोशन बाग परिसरात ही आंदोलन सुरू आहेत. तर अलीगढमध्ये अलीगढ मुस्लीम विद्यापीठ आणि शाहजमल इदगाह येथे ही निदर्शने सुरू आहेत. ही निदर्शने 13 डिसेंबरपासून सुरू आहेत. तर मोरादाबादमध्ये इदगाह मैदानावर पंधरवड्यापासून निदर्शने सुरू आहेत. त्या निदर्शकांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. कानपूरमध्ये का कायद्या विरोधात महिनाभरापासून निदर्शने सुरू आहेत. शहराच्या चमनगंज भागातील निदर्शने बंद पाडण्याचा प्रयत्न पोलिसांनी गेल्या आठवड्यात केल्याने या संवेदनशील शहरात तणाव निर्माण झाल होता. त्यामुळे ही निदर्शने सुरू ठेवू देण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला.
साहरणपुरातील देवबंदमध्ये इदगाह मैदानानवर निदर्शने गेले 11 दिवस सुरू आहेत. रायबरेली, आझमगढ, वाराणसी, इटवाह यांसारख्या जिल्ह्यात निदर्शने सुरू झाली होती मात्र ती बंद पाडण्यात पोलिसांना यश आले. आझमगढ मधील आंदोलन बंद करताना पोलिसांनी केलेल्या कारवाईतील पिडितांची प्रियांका गांधी यांनी भेट घेतल्याने त्यावरून राजकीय वातावरण पेटले आहे.