माळशिरस होणार आदर्श गाव : सरपंच महादेव बोरावके
भुलेश्वर- पुरंदर तालुक्यातील माळशिरसच्या गावकारभाऱ्यांनी गावाचा कायपालट करण्यासाठी विडा उचलला आहे. यासाठी गावात सुख- सुविधा देण्यासाठी करवसुली पूर्ण झाली पाहिजे, यासाठी हिवरे बाजार येथे अभ्यास दौरा आयोजित केला होता. सरपंच महादेव बोरावके आणि पदाधिकाऱ्यांनी कंबर कसली आहे. यासाठी सर्व ग्रामपंचायत सदस्य, कर्मचारी, ग्रामस्थांचा सहभाग वाढला आहे. मार्चपूर्वी 100 टक्के करवसुली करण्याचा निर्धार सरपंच बोरावके यांनी व्यक्त केला आहे.
पुरंदर तालुक्याच्या पूर्व भागातील माळशिरस गाव आता आदर्श गाव होईल, असा विश्वास सरपंच महादेव बोरावके यांनी केले. माळशिरस येथे ग्रामस्थांकडून ग्रामपंचायत कर वसूली करत असताना ते ग्रामस्थांशी संवाद साधत होते. त्यावेळी ते बोलत होते. गेल्या महिन्यात एक आदर्श गाव कसे असते. तेथील प्रशासकीय यंत्रणा कसे काम करते, हे पाहण्यासाठी माळशिरस ग्रामपंचायतीच्या वतीने 14 व्या वित्त आयोग निधीमधून अभ्यास दौरा सहल आयोजित केली होती. यावेळी आदर्श ग्राम पुरस्काराने सन्मानित पाटोदा व हिवरे बाजार या गावांची यावेळी पाहणी केली. त्याठिकाणी झालेल्या चर्चेमध्ये गाव आदर्श करायचे असल्यास सर्वात आधी गावाची वसुली 100 टक्के होणे गरजेचे आहे. कारण निधीशिवाय सोयी सुविधा होत नाहीत, हे लक्षात आल्याने मार्चपूर्वीच गावाची 100 टक्के वसुली करण्याचा निर्णय घेतला आहे.
यासाठी घरोघरी जाऊन ग्रामस्थांसोबत स्वत: संवाद करून वसुली करायचे ठरवले आहे. त्याप्रमाणे करवसुली सुरू केली आहे. यावेळी उपसरपंच मोहन यादव, ग्रामसेवक सोनाली पवार, पोंढे गावाच्या ग्रामसेवक नावले उपस्थित होत्या. या करवसुलीसाठी ग्रामपंचायतीचे वसुली कारकून गालीफ शेख, पाणी पुरवठा कर्मचारी मुनीर शेख, संगणक परिचालक पल्लवी आबनावे व शिपाई बालाजी बोरवके हे प्रयत्न करीत आहेत.