प्रचंड उत्साह व आनंदाचा ऋतू म्हणजे पावसाळा. त्यामुळे अबाल-वृद्धांना पावसाचे खास आकर्षण असते. तरीही आरोग्याची सर्वाधिक काळजी घेण्याचा ऋतूही पावसाळाच असतो.
या ऋतूत पाण्यापासून आणि डासांपासून होणाऱ्या आजारांपासून बचावाची आवश्यकता असते. पिण्याचे पाणी दूषित असल्यास डायरिया, टायफॉईड, कावीळ, मलेरिया, डेंग्यू यासारख्या आजारांची लागण होऊ शकते. तर सर्दी, खोकला व तापाची लागण होण्याचीही दाट शक्यता असते.
त्यामुळे पावसाळ्यात घरांच्या आसपासच्या परिसरात पाणी साचून राहणार नाही, तसेच परिसर स्वच्छ राहील याची काळजी घ्या. रिकामे जुने डबे, टायर, नारळाच्या करवंट्या किंवा सांडपाण्याची डबके आदींवर कीटक नाशक औषधांची फवारणी करा.
बाहेरचे व उघड्यावरचे अन्नपदार्थ खाणे शक्यतो टाळा. संततधार पाऊस सुरू असल्यास नळांद्वारे येणारे पाणी गढूळ येण्याचीही दाट शक्यता असते. हे पाणी गाळून, उकळून तसेच निर्जंतुक करून पिणे कधीही उत्तम.