पुणे – पारंपरिक पदवी प्रथम वर्षाचे अनेक विद्यार्थी परीक्षांचा फॉर्म भरायला टाळाटाळ करत आहेत. फोन केल्यावर “आम्हाला परीक्षेचा अर्ज भरायचा नाही,’ अशी उद्धट उत्तरेही प्राध्यापकांना मिळत आहेत. एवढेच काय प्राध्यापकांचे फोन नंबर ब्लॉक केले जात असल्याची खंत काही प्राचार्यांनी व्यक्त केली. ही मुले अर्ज भरण्यास का नकार देत आहेत? हीच बाब शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांना भेडसावत आहे.
सध्या विद्यापीठाच्या परीक्षा अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू आहे. मात्र कला, वाणिज्य आणि विज्ञान या पदवी प्रथम वर्षे प्रवेशासाठी परीक्षा अर्ज भरण्यास विद्यार्थ्यांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. करोना काळातील अनुभव पाहता अनेक विद्यार्थ्यांची बदललेली मानसिकता, यांसह अन्य कारणांमुळे विद्यार्थी उच्च शिक्षणातून प्रवाहाबाहेर जात असल्याची चिंता काही प्राचार्यांनी व्यक्त केली आहे.
करोना काळात मुले दीड-दोन वर्षे घरीच होते. त्यावेळी घरातील व्यवसायाकडे लक्ष आणि मदत, छोट्या-छोट्या व्यवसायास प्राधान्य, कौटुंबिक अडचणींसारख्या कारणामुळे मुलांचा पारंपरिक पदवी शिक्षणाकडे कल कमी होत आहे. काही विद्यार्थी बारावीनंतर व्यावसायिक शिक्षणाचा पर्याय निवडत आहेत. त्यामुळे पारंपरिक विषयांच्या पदवीसाठी प्रथम वर्षात प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या सातत्याने घटत आहे, असे निरीक्षण काही प्राचार्यांनी नोंदवले आहे.
प्रवेश अर्ज न भरण्याची कारणे
- करोनाची पार्श्वभूमी; विद्यार्थ्यांची मानसिकता बदलली
- विद्यार्थ्यांचा पदवीपेक्षा अन्य रोजगाराभिमुख शिक्षणाकडे कल
- विद्यार्थ्यानी शिक्षणाची दिशा अथवा मार्ग बदलला
- मुलींचे विवाह, कौटुुंबिक अडचणी
- पदवी घेऊनही नोकरीविषयी साशंकता
“उच्च शिक्षणाकडे विद्यार्थ्यांकडून होणारे दुर्लक्ष ही स्थिती महाविद्यालयनिहाय वेगवेगळी आहे. मात्र बहुतांश महाविद्यालयात प्रथम वर्षे प्रवेश अर्जाकडे पाठ फिरवित असल्याचे चित्र आहे. काही महाविद्यालये विद्यार्थ्यांना किमान परीक्षा अर्ज भरण्यासाठी बोलावून देखील येत नसल्याचा अनुभव पाहावयास मिळत आहे, ” असे डॉ. संजय चाकणे (प्राचार्य, टी. जे. महाविद्यालय, खडकी) म्हणाले.
“सध्या परीक्षा अर्ज भरण्यास उदासिनता आहे. त्याची कारणे शोधून त्यादृष्टीने पाऊल उचलणे अपेक्षित आहे. विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मूळ प्रवाहात आणण्यासाठी, त्यांच्यामध्ये शिक्षणाविषयी आवड निर्माण होण्यासाठी विविध उपक्रम राबविणे आवश्यक आहे,” असे डॉ. के. सी. मोहिते (प्राचार्य, सी.टी. बोरा महाविद्यालय, शिरूर) म्हणाले.