पुणे – मोदी सरकारने गेल्या नऊ वर्षांत तब्बल 176 योजना राबवल्या. त्या महाराष्ट्रात घरोघरी पोचवण्यासाठी दि. 30 मे ते 30 जून पक्षाच्या वतीने अभियान राबवले जाणार आहे, अशी माहिती प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. आगामी विधानसभा निवडणुकीत 220 हून अधिक जागा जिंकण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे बावनकुळे म्हणाले.
येथे झालेल्या प्रदेश कार्यकारिणी बैठकीनंतर बावनकुळे बोलत होते. “आगामी महापालिका, विधानसभा आणि लोकसभा निवडणुकीचा विचार आम्ही करत आहोत. सन 2024 च्या लोकसभा निवडणुकीत आम्ही महाविजयाचा संकल्प केला आहे. त्या पार्श्वभूमीवर प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचे आमचे उद्दिष्ट असून, यामध्ये 35 लाख कार्यकर्ते सहभागी होणार आहेत,” असे बावनकुळे म्हणाले.
केंद्र आणि राज्याने केलेली कामे, मोदी, शिंदे आणि फडणवीस यांच्यावर असलेला जनतेचा विश्वास याचा उपयोग होईल. आता जनता कोणत्याही भूलथापांना बळी पडणार नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री राहिले, तर आपण पुन्हा निवडून येणार नाही. राष्ट्रवादी कॉंग्रेस शंभर जागांवर निवडून येईल, या भीतीने शिवसेनेचे आमदार त्यांच्यापासून दूर झाले. ठाकरे यांनी त्यांच्या आमदारांना न्याय दिला नाही.
शिंदे गटाचे आमदार हे त्यांच्या मतदारसंघांमध्ये स्ट्रॉंग आहेत. शिंदे आणि फडणवीस सरकार ज्या पद्धतीने काम करत आहेत, त्या ताकदीने सर्व आमदार कामाला लागले आहेत. या सरकारचे एकत्र असणे हे नैसर्गिक आहे, असे बावनकुळे म्हणाले.