मतदारसंघातील सर्वसामान्य नागरिकांसह पक्षातील कार्यकर्ते नाराज
मंचर : शिरूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ. अमोल कोल्हे यांची खासदारकी “टर्म’ संपण्याच्या उंबरठ्यावर असताना अजूनही मतदारसंघातील जनतेसाठी ते पुरेसा वेळ देत नसून पक्षातील कार्यकर्ते त्यांच्यावर नाराज आहेत.
शिरूर लोकसभा मतदारसंघात पक्षाच्या विविध कार्यक्रमांना खासदार कोल्हे आमंत्रण देऊनही उपस्थित राहत नसल्याने राष्ट्रवादीचे कार्यकर्ते कार्यक्रम पत्रिकेत त्यांचे नाव टाकण्यास टाळत आहे. खा. कोल्हे यांनी मतदारसंघातील जनतेला विविध आश्वासने दिली. यापुढील काळात अभिनय क्षेत्र सोडून शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेसाठी काम करणार असल्याची त्यांनी जाहीर सभेत सांगितले.
अभिनयासाठी अधिक वेळ
डॉ. कोल्हे यांना मतदारसंघात येण्यास वेळ मिळत नसून ते अभिनय क्षेत्रातच जास्त वेळ देत आहेत. सध्या त्यांची छत्रपती संभाजी महाराजांच्या महानाट्याचे प्रयोग राज्यभर उत्साहात साजरे होत आहेत. मात्र शिरूर लोकसभा मतदारसंघात काय सुरू आहे, याकडे मात्र त्यांचे दुर्लक्ष आहे. येथे खासदार निधी खर्च होत नाही.
दौऱ्यांना मुहूर्त मिळेना
डॉ. कोल्हे यांनी 24 जून 2021 रोजी आंबेगाव तालुक्यातील 17 ते 18 गावांचा गाव भेट दौरा कार्यक्रम आयोजित केला होता. मात्र, हा कार्यक्रम रद्द केला. त्यावेळी कोल्हे यांनी लवकरच पुन्हा दौरा करणार असल्याचे जाहीर केले होते. मात्र दोन वर्षात त्यांनी दौरा केला नाही.
दिवसा वीज देण्याच्या प्रश्न मार्गी प्रलंबितच
शिरुर लोकसभा मतदारसंघात बिबट्याचे शेतकऱ्यांवर होणारे हल्ले लक्षात घेता शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळावी यासाठी डॉ. कोल्हे यांनी पाठपुरावा करत असल्याचा पत्रव्यवहार संबंधित विभागाशी केला होता. मात्र त्यांचा पाठपुरावा काही दिवसापुरताच मर्यादित होता. थापलिंग यात्रेनिमित्त उपस्थित असताना कोल्हे यांनी शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळण्याबाबचा प्रलंबित प्रश्न मार्गी लागेल असे आश्वासन दिले होते. मात्र अद्यापही शेतकऱ्यांना दिवसा वीज मिळाली नाही.
माजी गृहमंत्र्यांकडे नाराजी व्यक्त
शिरूर लोकसभा मतदारसंघातील पाचही लोकप्रतिनिधी राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आहेत. त्यामध्ये आंबेगाव विधानसभा मतदारसंघात दिलीप वळसे पाटील, जुन्नर विधानसभा मतदारसंघात अतुल बेनके, शिरूर हवेली विधानसभा मतदारसंघात अशोक पवार, खेड आळंदी विधानसभा मतदारसंघासाठी दिलीप मोहिते पाटील, व हडपसर मतदार संघासाठी चेतन तुपे हे राष्ट्रवादीचे लोकप्रतिनिधी आहे. यांनी कोल्हे यांना निवडून आणण्यासाठी प्रचारात सक्रिय सहभाग घेतला होता. मात्र अमोल कोल्हे निवडून आल्यानंतर आमदारांच्याच नियोजित कार्यक्रमाला दांडी मारत आहे. त्यामुळे हे आमदार व खासदार कोल्हे यांचा जास्त संपर्क नसल्याची चर्चा ही मतदारसंघात आहे.