चेन्नई – दाक्षिणात्या चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध सिनेनिर्माते व दिग्दर्शक टी रामाराव यांचे आज वृद्धापकाळाने निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. त्यांनी अमिताभ बच्चन आणि रजनीकांत यांच्यासह भारतीय चित्रपटसृष्टीतील आघाडीच्या तारकांसोबत काम केले आहे. त्यांना वृद्धापकाळाशी निगडीत काही आजार होते त्यातच त्यांचे निधन झाले. त्यांनी हिंदी चित्रपटसृष्टीतही मोठे योगदान दिले आहे.
एकही भुल, अंधा कानुन, जुदाई, मांग भरो सजना, इन्कलाब, खतरो के खिलाडी, हतकडी हे त्यांचे काही नावाजलेले चित्रपट होते. 1966 ते 2000 या कालावधीत त्यांनी हिंदी व तेलगु भाषेतील सुमारे 77 चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. दहा-बारा वर्षांपासून ते चित्रपट क्षेत्रातून निवृत्त झाले होते. 1966 ला त्यांनी नवरात्री हा पहिला तेलगु चित्रपट दिग्दर्शित केला होता. त्यांच्या पश्चात तीन मुले आणि पत्नी असा परिवार आहे. त्यांच्या निधनाबद्दल चित्रपटसृष्टीतील अनेकांनी त्यांना श्रद्धांजली वाहून शोक व्यक्त केला आहे.